🕒 1 min read
मुंबई – तब्बल २० वर्षे जुन्या हत्याकांडाचा न्याय मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आज पुन्हा एकदा याच प्रतीक्षेतून आणि निराशेने कोर्टाबाहेर आले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) आणि त्यांचे चालक समद काझी दुहेरी हत्याकांडाचा निकाल आज अपेक्षित होता. मात्र, काही न्यायालयीन तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने हा निकाल आता २० जूनपर्यंत पुढे ढकलला आहे.
पवनराजे निंबाळकर खटला: ओमराजेंचा गंभीर आरोप
न्यायालयाच्या या निर्णयानंतर ओमराजे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या. “गेली २० वर्षे आणि १३ दिवस आमची दोन्ही कुटुंबे न्यायाची वाट पाहत आहेत. आपल्याच बाजूने निकाल लागणार हे माहीत असल्याने आरोपी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
या खटल्याच्या निमित्ताने त्यांनी जुन्या राजकीय वैरालाही उजाळा दिला. २००४ च्या निवडणुकीत अवघ्या ४८४ मतांनी त्यांच्या वडिलांचा पराभव झाला होता. राजकीय विरोधक नको म्हणूनच पवनराजे यांची अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध हत्या करण्यात आल्याचा दावा ओमराजेंनी केला.
“एका माणसाला मारल्याने तुमचा राजकीय विरोधक कधीच संपत नसतो, उलट तो नव्याने तयार होतो,” याच जिद्दीने आपण राजकारणात पाऊल ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे हे हत्याकांड घडले होते. तब्बल २५ लाखांची सुपारी देऊन हे कृत्य घडवून आणलं होतं. यामध्ये राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ जणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. आता २० जूनला तरी न्यायदेवता योग्य तो कौल देणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
- मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?
- रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; पंढरपुरात नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










