🕒 1 min read
प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेल्या राजकीय नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आणि टोलेबाजी आज विधानपरिषदेतही पाहायला मिळाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Uddhav Thackeray ) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे सभागृहात उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. फडणवीसांच्या या “ऑफर”मुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांच्या या टर्ममधील शेवटच्या अधिवेशनात आज त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आणि विरोधी पक्षातून उद्धव ठाकरे व इतर सदस्यांनी दानवे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
Devendra Fadnavis offered to Uddhav Thackeray
अंबादास दानवे यांच्या कारकिर्दीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेता म्हणून दानवे यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मी स्वतःही काही काळ हे पद भूषवलं आहे आणि माझ्या आयुष्यातील बराच काळ विरोधी पक्षातच गेला आहे. त्यामुळे विरोधात कसं काम करायचं, यात माझी पीएचडी झाली आहे.”
पुढे बोलताना फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “जसा मला विरोधात काम करण्याचा अनुभव आहे, तसाच आता शासनात काम करण्याचाही दहा वर्षांचा अनुभव आहे. अंबादास दानवे यांनी कधी आक्रमक होत, तर कधी गौप्यस्फोट करत या पदाला न्याय दिला आहे. या टर्मचा त्यांचा निरोप असला तरी, त्यांनी पुन्हा सभागृहात यावं, अशा आपल्या शुभेच्छा आहेत.”
यावरच न थांबता फडणवीस यांनी पुढे एक विधान केले, ज्यामुळे सभागृहात हास्याचे आणि कुजबुजीचे वातावरण निर्माण झाले. “दानवे यांनी पुन्हा सभागृहात आल्यावर याच पदावर काम करावं, असं काही नाही. आता मी असं म्हटलो की, उद्धवजी म्हणतील, ‘आम्ही पळवापळवी करतोय’,” असं फडणवीस म्हणताच समोरच्या बाकावरून उद्धव ठाकरे यांनी टिप्पणी केली.
ठाकरेंच्या टिप्पणीनंतर फडणवीस यांनी थेट त्यांना उद्देशून म्हटले, “उद्धवजी, २०२९ पर्यंत तरी आमचा त्या बाजूला (विरोधक) येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.” फडणवीस यांनी अंबादास दानवे हे कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी आहे आणि ते आपला विचार सोडणार नाहीत, असंही नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनीही दानवे यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे म्हणाले, “विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे या सभागृहातील आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म पूर्ण करत आहेत. त्यामुळे अंबादास दानवे, तुम्ही जोरात ‘पुन्हा येईन’ म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे, पण त्याच पक्षातून ‘पुन्हा येईन’ म्हणा.”
यावेळी उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) फडणवीसांवर चिमटा काढत म्हटले, “अंबादास दानवे यांचं कौतुक ऐकून आज बरं वाटलं. कारण आज कौतुक करणारे दानवेंची उमेदवारी जाहीर केली, तेव्हा वेगळाच चेहरा करून बसले होते.” पुढे ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री आता सभागृहात बसलेले नाहीत, पण त्यांना मी मोकळ्या मनाने धन्यवाद देतो आणि प्रांजळपणे कबूल करतो की, तुम्ही संघाच्या किंवा भाजपच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्यासारखेच ते मला धन्यवाद देतील की नाही, माहीत नाही. कारण माझ्याकडूनही त्यांनी काही लोक घेतले.” या शाब्दिक कोट्या आणि प्रतिटोल्यांनी आजचा विधानपरिषदेचा निरोप समारंभ चांगलाच गाजला.
📌 महत्वाच्या बातम्या
- बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग, 20 हजार दे नाहीतर बदनामीची धमकी
- युनियन बँकेच्या ‘मराठीविरोधी’ धोरणाविरोधात मनसे आक्रमक; नागपुरात बँक शाखेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त!
- हनीट्रॅपच्या जाळ्यात वरिष्ठ अधिकारी; कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












