Santosh Deshmukh । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आष्टी तालुक्यातील साठवण तलाव प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.
“संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल. माझी बीडच्या जनतेला विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. महाराजांनी जसे १८ पगड जातींनी एकत्र करुन स्वराज्याचा स्थापना केली. तसेच आपल्याला सर्वांना एकत्र नांदायचे आहे. लवकरच आपण एक नवीन बीड आपण तयार करु,” असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिला असल्याने या जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे. संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली कणखर भूमिका जनतेला आवडली आहे. मी कोणालाच सोडणार नाही, असे तुम्ही म्हणता. जनतेला तुमच्यावर विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील राख माफिया, वाळू माफिया आणि भूमाफियांनाही मकोका लागला पाहिजे,” अशी मागणी धस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis on Santosh Deshmukh murder case
दरम्यान, आज देवेंद्र फडणवीसांचा बीड जिल्हा दौरा असूनही धनंजय मुंडे यांनी याकडे पाठ फिरवली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. “माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने सर यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल,” अशी माहिती मुंडेंनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :