🕒 1 min read
मुंबई : शरद पवार यांना सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरल्याची स्पष्ट कबुली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळाले नाही. याबाबत विचारले असता, पवार साहेबांनी त्यांचा विरोध केला असण्याची शक्यता भास्कर जाधव यांनी मान्य केली. मात्र त्यांनी यामागचं कारणही स्पष्ट केलं. “पवार साहेब मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी माझ्या मंत्रीपदाला जर विरोध केला असेल, तर तो योग्यच केले,” असं जाधव म्हणाले.
ज्या काळात भास्कर जाधव शिवसेनेत होते, त्या काळात त्यांच्याकडे उमेदवारी मिळण्यासारखी लायकी नव्हती, असं तेच कबूल करतात. “त्या वेळेस पवार साहेबांनी मला राष्ट्रवादीत घेतलं, सरचिटणीस केलं, विधान परिषद आणि विधानसभा दिली, मंत्रीमंडळात घेतलं, पक्षाचं अध्यक्षपद दिलं… आणि मीच त्यांना सोडलं. त्यामुळे त्यांनी विरोध केला असेल तर तो योग्यच होता,” असं सांगताना त्यांनी ( Bhaskar Jadhav ) आत्मपरीक्षणही केलं.
Bhaskar Jadhav regrets leaving Sharad Pawar
पवार साहेबांना अनेकांनी सोडलं, पण त्यांनी कधीच खंत व्यक्त केली नाही. मात्र “मी त्यांना सोडलं तेव्हा त्यांना दुःख झालं,” असं नंतर समजल्याचंही जाधव यांनी सांगितलं. “मी अध्यक्ष असताना विचारायचो सगळे सोडून जातात, तुम्ही त्यांना माफ का करता? ते हसायचे. मला वाटतं, त्यांनी पहिला प्रयोग माझ्यावरच केला,” असा मिश्किल टोमणा त्यांनी मारला.
जाधव पुढे म्हणाले, “हे मी आज शिवसेनेत असताना बोलतोय. याचे परिणाम भोगावे लागले तरी चालतील. पण चूक ती चूकच. आणि पवार साहेबांनी असं काही केलं असेल, तरीही त्यांचं आजही माझ्यावर प्रेम आहे, असा माझा विश्वास आहे.”
मंत्रीपद न मिळण्याबाबत ते म्हणाले, “माझं राजकीय हित सांभाळणं हे पवार साहेबांचं काम नव्हतं. मी ज्या पक्षात होतो, ती जबाबदारी त्या पक्षाची म्हणजे शिवसेनेची होती,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावरच बोट ठेवलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- भास्कर जाधव यांची नाराजी; राजकारणातून निवृत्तीच्या विचारात
- लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज ‘शून्य टक्के’ व्याजदराने
- गोव्यात उत्साहात साजरा झाला ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








