Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आज अकराव्या दिवशीही सुरूच आहे. काल मध्यरात्री काही मंत्र्यांनी फोनवरून चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी वैद्यकीय उपचार पुन्हा सुरू केले होते. त्यामुळे आज सरकारचं एखादं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला जाईल, अशी दाट शक्यता होती. पण आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आता सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असतील, तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचं विखे पाटील म्हणाले. शासनाकडून जे काही निर्णय घेणं आवश्यक होतं, ते घेण्यात आले आहेत. सरकारकडून मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. तरीही जरांगे पाटील यावर समाधानी नसतील, तर आता त्यांचं समाधान करू शकेल असा दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नसल्याचं विखे पाटलांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.
Maratha Reservation: ‘सरकार एक पाऊल पुढे येतंय, जरांगेंनी समजून घ्यावं’
न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून आतापर्यंत कुणबी नोंदी शोधण्याचं मोठं काम झालं आहे. विखे पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ५८ लाख नोंदी सापडल्या असून त्या ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे अनेक लोकांनी अर्ज केले असून, काहींना दाखले देण्याचं कामही मार्गी लागलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर पुढाकार घेऊन जे काम केलं, त्याला नावं ठेवणं मराठा समाजही मान्य करणार नाही, असं म्हणत त्यांनी नेत्यांची पाठराखण केली.
याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षण कसं गेलं, याची आठवण त्यांनी करून दिली. दुसरीकडे, सरकार जर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे येत असेल, तर जरांगे पाटलांनीही ते समजून घेत सरकारला योग्य तो प्रतिसाद द्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार का, या प्रश्नावर बोलताना विखे पाटलांनी स्पष्ट नकार दिला. आमचे निर्णय घेऊन झाले आहेत, जे जे पर्याय उपलब्ध होते ते सर्व आम्ही वापरले आहेत. त्यामुळे आता या विषयात राजकारण न आणता प्रश्न सुटला पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे सध्या स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदी शोधण्याचं काम पाहत आहेत. त्यामुळे आता यातून जरांगे पाटीलच योग्य तो मार्ग काढतील, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; फडणवीस आणि विखे पाटलांची सर्वात मोठी घोषणा
- ‘दहीहंडीत पोरी नाचवणारे देशद्रोही!’; गौतमी-राधा पाटील यांच्या नृत्यावरून संभाजी भिडे संतापले
- पंजाबराव डखांचा पावसाचा नवा अंदाज! राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार, बळीराजाला मोठा दिलासा












