धाराशिव: मराठा समाज आणि राज्य सरकारमध्ये नेमकं काय शिजतंय? कोण करतंय ही अडवणूक? हा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आलाय. कारण, नरेंद्र पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाज आणि सरकारमध्ये दरी निर्माण करत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी धाराशिवमध्ये केला.
आरक्षणाचा मुद्दा आधीच तापलाय. त्यातच आता हे नवं प्रकरण समोर आलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर पाटील यांनी थेट बोट ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालावं, अशी थेट मागणी त्यांनी (Narendra Patil) केलीये.
मराठा आरक्षण आणि अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा
एकीकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे मैदानात आहेत. दुसरीकडे, नरेंद्र पाटील महामंडळाच्या कारभारावर नाराज आहेत. मराठा उपसमिती चांगलं काम करतेय, हे त्यांनी मान्य केलंय. पण मुख्यमंत्र्यांनी यात थेट लक्ष घातल्यास जास्त फायदा होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या त्यांच्या लाभार्थ्यांसोबत जिल्हावार बैठका सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून अटी-शर्तींचा जाच वाढवला जातोय. संबंधित अधिकारी स्वतः मराठा समाजाचे असूनही अशा जाचक अटी का? असा खडा सवाल त्यांनी विचारलाय.
त्यामुळेच तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने पाटील संतापलेत. आता तरुणांची मोट बांधून सरकारविरोधात थेट आंदोलन उभारण्याचा इशाराच त्यांनी दिलाय.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
- ‘आमदार पाडूनच दाखवा!’; मनोज जरांगेंच्या इशाऱ्याला प्रवीण दरेकरांचं खुलं आव्हान, राजकारण तापलं!
- जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास, पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी?













