Rohit Pawar: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाची दिशा बदलत मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० सप्टेंबरपासून ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला परिस्थिती चिघळण्यापूर्वीच चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.
लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. “अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आजच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून तोडगा काढावा,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी गेल्यास आंदोलकांसह मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Manoj Jarange यांचे मुंबई आंदोलन
उपोषणाच्या १५ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अंतरवली सराटीतील उपस्थित महिला आंदोलकांनीही त्यांच्यासोबत मुंबईला येण्याची मागणी केली. मात्र, जरांगे पाटील यांनी महिलांना आझाद मैदानावर येण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे.
यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खोचक टीकाही केली. “सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू घेऊन जर महिला आल्या आणि त्यांच्या पत्नींनी ते स्वीकारले नाही, तर ते कसले हिंदू?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंची मराठा महिलांना हाक: अमृता फडणवीस, लता शिंदेंना हळदी-कुंकू लावण्याचे आवाहन
- मनोज जरांगेंचे आंदोलन खोटे; अजय बारसकरांचे आर्थिक व्यवहारांवरून गंभीर आरोप
- सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायत; शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











