पुणे– छत्रपती शिवरायांच्या नावावर राजकारण करणारे नेते खरंच त्यांच्या स्वाभिमानासाठी लढतात की फक्त सत्तेसाठी? हाच प्रश्न आता थेट साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत विचारला जातोय. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi Pune visit) पुणे दौऱ्यावरून शिवेंद्रराजेंनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसने असा काही पलटवार केलाय, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिवेंद्रराजेंनी राहुल गांधींवर शिवरायांचा विसर पडल्याचा आरोप केला होता. त्यावर काँग्रेसने सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर थेट ४ प्रश्नांची सरबत्ती केली. विशेषतः मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांना थेट घेरलं आहे.
शिवेंद्रराजेंचा आरोप आणि काँग्रेसचा ४ प्रश्नांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
शिवेंद्रसिंहराजे यांनी ट्वीट करत विचारलं होतं की, ‘राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?’ हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांचा उल्लेख पुणे दौऱ्यात टाळणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. शिवरायांचा सन्मान करणे ही केवळ राजकीय औपचारिकता नसून त्यांच्या महान कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आहे, अशी आठवण त्यांनी काँग्रेसला करून दिली.
दुसरीकडे, काँग्रेसने याला तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिलं. राहुल गांधींनी स्वराज्यजननी जिजाऊ, शिवराय, संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमांना तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. पण खरी ठिणगी उडाली ती काँग्रेसने विचारलेल्या चार प्रश्नांमुळे.
काँग्रेसने शिवेंद्रराजेंना विचारलंय की, राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विचारसरणीच्या देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत जाताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं म्हणणाऱ्या भगतसिंग कोश्यारींना तुम्ही कधी जाब विचारला का? महाराजांच्या स्वाभिमानापेक्षा तुम्हाला मंत्रीपद मोठं वाटतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या भ्रष्टाचारावर तुम्ही फडणवीसांना डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारलात का?
एवढंच नाही तर, भ्रष्टाचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्यांनी आम्हाला शिवप्रेम शिकवू नये, असा घणाघातही काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावरही अनेकांनी शिवेंद्रराजेंना प्रश्न विचारत त्यांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सहा महिन्यांनी लज्जा उत्पन्न झाली का?’ संगीता तिवारींचा रूपाली चाकणकरांवर घणाघात
- सायरनची दहशत आणि विना नंबर प्लेट गाड्यांचा सुळसुळाट: छत्रपती संभाजीनगरात नियम फक्त सामान्यांनाच का?
- अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











