Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेच्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरुन शिवसेनेतील कलह आणखी वाढला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय शिरसाट?

“शिवसेनेचा पक्ष निधी उद्धव ठाकरे यांनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला असा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही हे आम्ही सांगितलं होतं. शिवसेना भवन हे आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेलं मंदिर आहे. आम्ही त्यावर कधीही हक्क सांगणार नाही. तसंच निधीशीही आम्हाला काही घेणंदेणं नाही इतकं स्पष्ट सांगूनही उद्धव ठाकरेंनी एक दिवसात दुसऱ्या खात्यात निधी का वळवला?” असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी विचारला आहे.

“..म्हणूनच आम्हाला आयोगाने नाव आणि चिन्ह दिलंय”

“आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं ते याचमुळे”, असंही संजय शिरसाट यांनी म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटली अशी चर्चा होत असताना उद्धव ठाकरे मात्र चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि सगळी आशा आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आहे असं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुनावणी सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे अशात आता उद्धव ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आल्याच्या दुसऱ्या दिवशीही ‘मातोश्री’च्या बाहेर येत आणि जीपवर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं होतं आणि “घाबरू नका, खचून जाऊ नका आपल्याला सगळी सुरूवात पहिल्यापासून करायची आहे” असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-