🕒 1 min read
मुंबई: राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतल्याने, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद तात्पुरता शमला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा केली, त्यानंतर राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाहीर केलेला ५ जुलैचा मोर्चाही रद्द झाल्याचे दोन्ही पक्षांनी सांगितले. मात्र, हा निर्णय मागे घेतल्यावरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. “हे सगळं करण्याची गरजच नव्हती, सरकारने परत अशा भानगडीत जाऊ नये,” असा इशारा राज ठाकरेंनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याबद्दल राज ठाकरेंनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील मराठी जनतेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा त्यांना रद्द करणं भाग पडलं. यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं मी अभिनंदन करेन. खरं तर काहीही गरज नसताना हा विषय समोर आला होता. तो विषय आता रद्द झाला आहे. यासाठी मराठीजनांचे आभार मानेनच, पण त्याचबरोबर काही साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी माध्यमांचे पत्रकार व संपादक यांचेही मी आभार मानतो.”
Raj Thackeray Warn Devendra Fadnavis Over Hindi mandate
रद्द झालेल्या मोर्चाबाबत बोलताना राज ठाकरेंनी सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला. “हा विषय निघाला तेव्हा सर्वप्रथम आम्हीच त्याला विरोध केला. वातावरण तापू लागलं, त्यावेळी महाराष्ट्रातील इतर सगळे राजकीय पक्ष त्यात आले. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला. आम्ही मोर्चाची ५ तारीख जाहीर केली. हा मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यति असा मोर्चा निघाला असता. ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. मराठी माणूस एकवटला की काय होतं हे कळलं असतं. त्यामुळे सरकार परत अशा भानगडीत जाणार नाही अशी अपेक्षा मी बाळगतो,” असे त्यांनी ( Raj Thackeray ) ठामपणे सांगितले.
या प्रकरणी सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे दादा भुसे जेव्हा आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमचं ऐकून तर घेईन, पण ऐकणार नाही आणि या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयझनिंग आहे. हळूहळू या गोष्टी पेरल्या जातात. हा प्रकार त्यांनी करून पाहिला आणि तो त्यांच्या अंगाशी आला.”
ठाकरे पुढे म्हणाले, “आता ते समिती वगैरे नेमतायत. त्यांनी ती नेमावी किंवा काहीही करावं. आमचं त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण परत ही गोष्ट होणार नाही, एवढं सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाही.” हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचे सांगत ती एका प्रांताची भाषा असल्याचेही त्यांनी ( Raj Thackeray ) नमूद केले.
५ तारखेचा मोर्चा रद्द झाल्यावर आता विजयी मेळाव्याचे आयोजन करण्याबाबतही राज ठाकरेंनी माहिती दिली. “काल हा निर्णय आल्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता. त्यांनी विचारलं पुढे काय करायचं. मी म्हटलं आत्ता मोर्चा तरी रद्द करावा लागेल. मग ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी म्हटलं घेऊ. ५ तारखेला करू, पण ठिकाण वगैरे आत्ता जाहीर करू नका. त्याप्रमाणे मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन, मग माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील. मग ५ तारखेचा मेळावा होईल. त्या मेळाव्याला पक्षीय लेबलं लावण्यात अर्थ नाही. हा खरा तर मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीतूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे,” असे त्यांनी ( Raj Thackeray ) स्पष्ट केले.
उत्तर भारतातील लोक महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात, तर त्यांच्या भागात मराठी शिकवली पाहिजे. दीड-दोनशे वर्षांपूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षांपूर्वीच्या भाषेवर लादण्याचा प्रयत्न मान्य होणार नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकार झुकलं! हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा मोर्चा स्थगीत – संजय राऊत
- केतूचे नक्षत्र परिवर्तन: ६ जुलैपासून ‘या’ तीन राशींना मिळणार धनलाभासह प्रगतीची संधी!
- “सातबारा कोरा करा, नाहीतर सरकारचे बारा वाजवू!” – बच्चू कडूंचा फडणवीसांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












