🕒 1 min read
ठाणे, ८ जुलै: ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर मराठी येथे मराठी बोलण्यावरून झालेल्या वादामुळे तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला होता. आता याच मुद्द्यावर आज (८ जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी अस्मिता’ मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “कोणीही मोर्चासाठी परवानगी मागितली, तर आम्ही ती देतो. मात्र, पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं की, मनसेच्या मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती आणि मनसेचे नेते जाणीवपूर्वक असा मार्ग निवडत होते, जिथे संघर्ष होण्याची शक्यता होती. पोलिसांनी नेहमीच्या मार्गावरून मोर्चा काढण्याचा पर्याय दिला होता, पण मनसेच्या नेत्यांनी तो नाकारला आणि त्यांनी ठरवलेल्या मार्गावरच मोर्चा काढण्याचा हट्ट धरला. त्यामुळे पोलिसांनी त्या मार्गावरून मोर्चा काढण्याची परवानगी नाकारली.”
MNS march for Marathi pride
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “मनसे असो वा कोणताही पक्ष, मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल, तर ती नक्कीच मिळेल. परंतु, ‘आम्हाला याच मार्गावर मोर्चा काढायचा’, असा हट्ट धरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असेल, तर ते योग्य नाही. शेवटी आपल्याला एकाच राज्यात राहायचं आहे.”
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेने मोर्चा काढण्याची तयारी सुरूच ठेवल्यामुळे, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले असून, मराठीच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद! औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघात ॲड. ईश्वर नरोडे पाटलांचा दणदणीत विजय!
- लक्ष्मण हाकेंना अजित पवारांकडून कायदेशीर नोटीस; ‘ती’ वादग्रस्त विधाने भोवणार?
- मुंबईतील राज-उद्धव ठाकरेंच्या ‘विजयी मेळाव्या’त काँग्रेसची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!













