🕒 1 min read
IND vs NZ Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज खऱ्या अर्थाने धावांचा पाऊस पडला की न्यूझीलंडच्या गोलंदाजांची कत्तल झाली? हा प्रश्न आज किवी कर्णधाराला नक्कीच पडला असेल! दव पडेल या भीतीने न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत फायनलच्या महामुकाबल्यात थेट ५ बाद २५५ धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला आहे.
संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी तर किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. संजूने सर्वाधिक ४६ चेंडूंत ८९ धावा कुटल्या, ज्यात त्याने तब्बल ८ गगनभेदी षटकार आणि ५ खणखणीत चौकार ठोकले. तर ईशान किशनने २५ चेंडूंत ५४ आणि अभिषेकने २१ चेंडूंत ५२ धावांची स्फोटक खेळी करत मैदानात नुसती आग ओकली.
मधल्या फळीत जेम्स नीशमने सूर्यकुमार यादवला शून्यावर (०) आणि ईशान किशनला लागोपाठ बाद करून भारताची धावगती रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हार्दिक पंड्याही अवघ्या १८ धावांवर बाद झाल्याने टीम इंडियाची धावगती मंदावेल असे वाटले होते.
पण पिक्चर अभी बाकी होता! शेवटी आलेल्या शिवम दुबेने किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुबेने अवघ्या ८ चेंडूंत नाबाद २६ धावा (स्ट्राईक रेट ३२५.००) कुटत टीम इंडियाला पहिल्या डावाच्या अखेरीस एका महाकाय धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला तिलक वर्माची (नाबाद ८ धावा) साथ मिळाली.
संपूर्ण २० षटकांत भारताने १२.८ च्या रनरेटने धावा कुटल्या आहेत. आता दुसऱ्या डावात दव (Dew factor) पडले तरी न्यूझीलंडला हे IND vs NZ Final टार्गेट पार करणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत असणार आहे. आता बुमराह आणि अर्शदीप किवींना कसे गुंडाळतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत!
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










