Satyajeet Tambe | “परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच उमेदवारीवरून राजकारण”; सत्यजित तांबेंचा आरोप

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्जावरून काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाने कारवाई करत निलंबन केले. या कारवाईनंतर सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.  “उमेदवारी अर्जावरुन आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले आहेत. या विषयावर वेळ आल्यावर आपण बोलणारच आहोत” असा आरोप नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले सत्यजित तांबे?

“आपण काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु, काही कारणास्तव निर्णय झाला नाही. काँग्रेसकडून आपण उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र, एबी अर्ज आपल्यापर्यंत न पोहचल्याने अपक्ष उमेदवारी झाली” असेही सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

“मागच्या 20 वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून काम करत आलो आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून उमेदवारी केली आहे”, असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

“मतदारांचे प्रश्न गंभीर आहेत. अपुरी शिक्षक, शिपाई, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, भरती नसल्याने यंत्रणेवरील ताण, संस्थाचालकांचे मोठे प्रश्न आहेत. आज शाळा माजी विद्यार्थी आणि लोकसहभागावर सुरू आहेत, त्यामुळेच आगामी काळात यासाठी व्यापक काम करणार आहे. याच अनुषंगाने एप्रिल महिन्यात शिक्षक परिषद घेणार आहे” असंही सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

“राजकीय इच्छाशक्ती असेल तर जुन्या निवृत्तीवेतनाचा मुद्दा सुटेल, अन्यथा हा मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल. शिक्षणावर 7 टक्के खर्च करायला हवा, मात्र आपण अडीच टक्केच खर्च करत आहेत. याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे”, असेही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :