Chandrashekhar Bawankule | “राऊतांनी आमच्या हातात हात मिळवून महाराष्ट्राला…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Big Breaking | मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena) फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी होताना पहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकेची सरबत्ती सुरुच ठेवली आहे. दरम्यान, ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवर काल ६ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाने दावा ठोकला आहे. शाखेवर कब्जा केल्यावर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावर खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. पण, आमचा शिवसैनिक मागे कुठेही हटणार नाही. शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा हा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण, या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर होत आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचं काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करू नका, समोर या. हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. मात्र, लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule raction on Sanjay Raut’s statement

“संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी काम करावं. महाराष्ट्रातील जनता विकास मागत आहे. संजय राऊतांनी मनभेद होणार नाही, अशी वक्तव्ये करू नयेत. त्यांनी आमच्या हातात हात टाकून महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासाठी काम करावं,” असे आवाहन करत चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना भाजपसोबत येण्याचं आवतान दिलं आहे. बावनकुळेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

“आपले मनभेद, मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या”

“मी विरोधकांनासुद्धा विनंती करतो की, आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. आमची नेहमीच त्यांना साथ राहिल”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना-भाजपची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुटली होती. सेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्मुल्यावरुन मोठा वाद झाला आणि शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेली आणि महाविकास आघाडीचा त्यावेळी नवा जन्म झाला. मात्र आता पुन्हा  चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्याने संजय राऊत ठाकरे गट भाजपसोबत जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.