🕒 1 min read
Vishwa Hindu Parishad छत्रपती संभाजीनगर : ‘हम दो, हमारा एक’ ही हिंदू समाजाची मानसिकता चूक असून किमान दोन मुले असावीत, असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे. सध्याचा भारतामधील प्रजनन दर १.९२ असल्याचे माध्यमांमध्ये नुकतेच प्रकाशित झाले होते. पण लोकसंख्या स्थिर ठेवायची असेल तर तो २.१ असायला हवा असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे.
राम मंदिराच्या निर्माणानंतर नागरिकत्व संशोधन कायद्यान्वये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदू नागरिकांना आता नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सहज होऊ शकेल. पुढील काळात विश्व हिंदू परिषद या कामात अधिक लक्ष घालणार आहे. तसेच बेल्जियम, फ्रान्स व फिलीपिन्स या देशातही आता काम वाढविले जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत परदेशातून येणाऱ्या मुस्लीम व्यक्तींमुळे लोकसंख्येचा समतोल बिघडत चालला आहे. लव्ह जिहादसारखे मुद्देही त्यास कारणीभूत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी हम दो हमारा एक ही मानसिकता हिंदूंनी बदलायला हवी, असे मत परांडे यांनी व्यक्त केले.
येत्या काळात देशातील हिंदू मंदिरावर असणारे सरकारी नियंत्रण संपायला हवे, यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मात्र, केवळ नियंत्रण संपवून चालणार नाही तर मंदिरे योग्य पद्धतीने सुरू करण्यासाठी विधिज्ञ आणि माजी न्यायमूर्तीची समितीही तयार केली असून, त्यांनी एक प्रारूप ठरविले आहे. एखाद्या राज्यात तो प्रयोग करून पहावा लागेल. यावरही पुढील काळात विश्व हिंदू परिषद काम करेल, असे परांडे म्हणाले. जी मंडळी हिंदू हितास प्राधान्य देतील त्यांना मतदान करण्यासाठी जनजागरण हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ‘ नोटा’ वापरून आपले मत वाया घालवू नये, असे आवाहनही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Mahavitaran : महावितरणकडून दरवाढीचा शॉक; घरगुती वीज ग्राहकांसाठी ३५ टक्क्यांची वाढ
- अजित पवारांच्या चिंतेत वाढ; बारामतीच्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे नऊ वेळा आघाडीवर
- पुण्यात महिनाभर आधीच ‘केशर आंबा’ बाजारात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











