भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक आणि अशक्यप्राय विजयाचा शिल्पकार आता निवृत्त झालाय, यावर तुमचाही विश्वास बसत नाहीये ना? होय, संकटाच्या काळात टीम इंडियासाठी नेहमीच ‘संकटमोचक’ ठरलेला मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा कधीही खेळताना दिसणार नाही.
अजिंक्यने इंस्टाग्रामवर एका भावूक व्हिडीओद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळणाऱ्या ३८ वर्षीय अजिंक्यने ‘आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे’, असं म्हणत क्रिकेटच्या मैदानावरून निरोप घेतला. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतातून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Virat Kohli on Ajinkya Rahane Retirement
अजिंक्यच्या निवृत्तीनंतर सर्वाधिक चर्चा रंगलीय ती विराट कोहलीच्या (Virat Kohli) पोस्टची. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटने आपल्या खास मित्रासाठी अत्यंत भावूक संदेश लिहिला आहे.
“जिंक्स, मित्रा, तुझ्या अद्भुत कारकिर्दीबद्दल खूप खूप अभिनंदन. तू भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा तुला नेहमीच अभिमान असायला हवा. स्लिपमध्ये तुझ्यासारखा विश्वासार्ह खेळाडू नव्हता आणि कसोटी क्रिकेटमध्ये तू माझा सर्वात आवडता फलंदाजीचा साथीदार राहिला आहेस,” अशा शब्दांत विराटने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अजिंक्यचं नाव काढलं की २०२०-२१ चा तो ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौरा आपोआप डोळ्यांसमोर उभा राहतो. ॲडलेड कसोटीत संघ अवघ्या ३६ धावांवर गारद झाल्यानंतर आणि विराट मायदेशी परतल्यानंतर, रहाणेने ज्या पद्धतीने संघाची धुरा सांभाळली, त्याला तोड नाही.
मेलबर्नमध्ये शानदार शतक आणि थेट गब्बाच्या मैदानावर ३२ वर्षांचा ऑस्ट्रेलियन रेकॉर्ड मोडून भारताला मिळवून दिलेला तो मालिका विजय, क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत.
२०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या अजिंक्यने कसोटीमध्ये ६ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले, ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आणि एकही सामना गमावला नाही. एकदिवसीय आणि टी-२० मध्येही त्याची कर्णधार म्हणून आकडेवारी उत्तम राहिली.
आयपीएलमध्येही चेन्नईपासून ते कोलकातापर्यंत अनेक संघांचे प्रतिनिधित्व करताना त्याने ५३६७ धावा कुटल्या. एक शांत, संयमी पण मैदानात तितकाच घातक फलंदाज म्हणून अजिंक्य नेहमीच क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला राहील.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पावसाने झोडपला: हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’, पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे!
- देवोलीना भट्टाचार्जीच्या पोस्टमुळे मोठा वाद; ‘मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज…..’, सोशल मीडियावर नवा वाद!
- NEET आंदोलकांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय, सर्व FIR मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












