नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार आणि त्यावरून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता वाढता राजकीय पाठिंबा मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आंदोलनस्थळी जाऊन ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke) आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देतानाच केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचे वर्णन ‘लोकशाहीसाठीचा लढा’ असे केले आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.
“विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. ज्यांनी तुम्हाला ‘कॉकरोच’ म्हटलं… त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा देश कोणत्याही एका पक्षाने बनवलेला नाही. स्वातंत्र्यासाठी तुमच्यासारख्याच वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, म्हणून आपण आज स्वतंत्र भारतात उभे आहोत.”
उद्धव ठाकरे यांनी पुढे ब्रिटिश राजवटीचा संदर्भ देत म्हणाले की, त्या काळात क्रांतिकारकांनाही ‘दहशतवादी’ म्हटलं जात होतं. आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्याच प्रकारची भाषा वापरली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
“विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज लोकशाहीला शोभणारा नाही. काल ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, ती अत्यंत दुर्दैवी होती. पण आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्यामुळे सत्य लपवता येणार नाही. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटना जगासमोर आणले आहे, असे म्हणत त्यांनी कौतुक केले.
“आज ते सत्तेत आहेत, उद्या तुम्ही असाल. आज कदाचित ते सत्तेच्या खुर्चीवर बसले आहेत. पण उद्या त्या खुर्चीवर तुमच्यापैकी अनेक जण बसतील. काळ कायम एकसारखा राहत नाही.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंकडून अभिजीत दिपकेचे कौतुक
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे नाव घेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ते अमेरिकेत शिक्षण घेत असतानाही भारतात येऊन विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या करिअरपेक्षा देशातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय त्यांना अधिक महत्त्वाचा वाटला. हीच खरी युवा शक्ती आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आपण आठवतो. पण पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण विसरता कामा नये. फक्त सत्ता बदलून काही होणार नाही. संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खरा बदल होणार नाही. ही ठिणगी संपूर्ण देशात पोहोचली पाहिजे.”
आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “दिल्लीत सुरू झालेली ही लढाई संपूर्ण देशात पोहोचली पाहिजे. या आंदोलनाची ठिणगी कधीही विझता कामा नये. महाराष्ट्र या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मला अभिमान आहे की, महाराष्ट्रातील एक युवक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. “मी फक्त तुमचं मनोबल वाढवायला आलो नाही, तर तुमच्याकडून प्रेरणा आणि हिंमत घ्यायलाही आलो आहे.” यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले.
“धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या भिंती कोसळल्या पाहिजेत. राष्ट्र सर्वात मोठं आहे. One Nation, One Emotion.” असेही ते म्हणाले.
अभिजीत दिपकेने मानले उद्धव ठाकरेंचे आभार
यावेळी अभिजीत दिपकेने उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. आंदोलन सुरू झाल्यापासून ते सातत्याने संपर्कात असून, विद्यार्थ्यांची विचारपूस करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्क येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. दरम्यान, सभेच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी मोबाइलची टॉर्च सुरू करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय हिंद, जय भारत’ अशा घोषणांनी जंतर-मंतर परिसर दुमदुमून गेला.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोकणात भाजपाला मोठे खिंडार; कुडाळच्या नगरसेविकेने दिला तडकाफडकी राजीनामा
- CJP आंदोलनावर अखेर धर्मेंद्र प्रधान यांचे मौन भंग; NEET चर्चेसाठी सरकार तयार
- राहूल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन; नीटच्या मुद्द्यावरून विद्यार्थी राजकारणाचे बळी? सरकारचा काँग्रेसवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












