Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये प्रवेश करू शकतो का? याबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे. शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना हेच नाव घेऊन राज्यात सक्रिय राहू शकतो, असे अनेकांनी व्यक्त केले. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्याने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

“शिंदे गट भाजपमध्ये…” (Uddhav Thackeray talk about Shinde group)

“आमच्या घटनेत प्रमुख नेता हे पदच नाही. शिंदे गट भाजपमध्ये जाऊ शकत होते. आता ते भाजपमध्ये जाऊ शकणार नाही. कारण त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. भाजपनेही त्यांना मधल्यामध्ये लटकून ठेवलं आहे. शिंदे गटाचा भाजपमध्ये समाील होण्याचा पर्याय संपुष्टात आला आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या दाव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

“आमच्या बाजूत कुठेही खोट नाही. निवडून आलेले सदस्य जिकडे जातील तिकडे पक्ष जात नाही. एक सदस्य गेला म्हणजे पक्ष गेला असं नाही. एकेकाळी भाजपचे दोनच खासदार होते. ते काँग्रेसमध्ये गेले असते तर भाजप संपला असता का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

“शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र”

“शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. घटनातज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा निर्णय आधी लागावा अशी आमची इच्छा आहे. आयोगानं जे काही मागितलं, ते सगळं आम्ही आयोगाला पुरवलं आहे. पण नंतर हे गद्दार गट सांगायला लागले की आमच्याकडे आमदार-खासदार जास्त आहे. एखाद्याला ओसरी राहायला दिली तर तो उद्या घरावर अधिकार सांगायला लागला असा तो प्रकार झाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“त्यांना समजलंय आमचंच पारडं जड”

“निवडून आलेल्या प्रतिनिधींवरच ठरवायचं असतं, आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता तर दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या काळात त्यांनी आम्हाला जो खटाटोप करायला लावला, तो आम्ही व्यवस्थित केला आहे. मधल्या काळात आमच्या शपथपत्रांवरही आक्षेप घेतला. मग तो आक्षेप का घेतला? जर तुम्हाला ती मानायचीच नव्हती, तर मग आक्षेप का घेतला? त्यांना आता कळलंय की यांचं पारडं जड आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही” (Uddhav Thackeray criticize Eknath Shinde group)

“घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचं पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पदं आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आयोगाच्या मान्यतेनुसारच आम्ही कारभार करतो. आता त्यांची अडचण ही झालीये की त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच. अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसा सांगणार? त्यामुळे यात वेळ लागावा, विलंब व्हावा म्हणून ही खुसपटं काढायची आणि नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.