🕒 1 min read
पुणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेताना सुनेत्रा पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था उभारून संपर्क पूर्ववत करावा. प्रत्येक निर्णय घेताना मानवी जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 24×7 पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा तसेच धोकादायक भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून सुरक्षित निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पूर, भूस्खलन आणि धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाबाबत नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी एसएमएस (SMS), सोशल मीडिया (Social Media), ग्रामपंचायत (Grampanchayat) आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही आणि सर्व यंत्रणा कायम सज्ज ठेवाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.
सुनेत्रा पवार यांनी NDRF, SDRF, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य राबवण्यास सांगितले. बंद रस्ते, पूल आणि घाट परिसरात कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक भागात जाण्यापासून रोखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय, मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी आणि अफवांवर नियंत्रण ठेवून केवळ अधिकृत माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीवरील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे किंवा पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे. प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अद्ययावत अहवाल शासनाला सादर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवेदनशील भागांवर देखरेख ठेवावी. कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आयटी पार्क आणि औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा (Red Alert) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘वर्क फ्रॉम होम द्या, हा मानवतेचा धर्म आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचा खासगी कंपन्यांना इशारा
- निखिल चव्हाणच्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकात तुकाराम मुंढेंची चर्चा; ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा!
- गौरव मोरेच्या घरी अचानक पोहोचला ‘कॉमेडीचा बाप’; अभिनेत्याची पोस्ट पाहून सेलिब्रिटीही झाले थक्क!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












