🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर – स्वाभिमानाची आणि इतिहासाची शान असलेले हे शहर, आज पाण्यासाठी व्याकूळ ( Water Crisis ) झाले आहे. गेल्या वीस वर्षांपासून येथील नागरिक पाण्याच्या समस्येने ग्रासले आहेत. पण पाण्याची तहान काही भागलेली नाही. शहराच्या तहान भागवण्यासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दर उन्हाळ्यात नागरिकांचे ओठ सुकतात, पण सत्तेवर बसलेल्यांची अंतःकरणं मात्र नाही! महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाने समृद्ध असलेले शहर, आज अत्यंत दुर्दैवाने पाण्यासाठी हंबरडा फोडत आहे.
ही परिस्थिती उद्भवायला सत्ताधारी, विरोधक, प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सर्वच जबाबदार आहेत. शहरातील जलप्रश्नावर केवळ राजकारण होत आहे, उपाययोजना मात्र होण्याचे नाव घेत नाही.
Water Crisis in Chhatrapati Sambhajinagar
शहराच्या रस्त्यांवर रिकाम्या हंड्यांची पालखी निघाली तेव्हा ते फक्त आंदोलन नव्हते, ते होते जनतेच्या फाटलेल्या आवाजाचे गगनभेदी आरोळण. संत तुकारामांच्या अभंगांनीही आज या आक्रोशाला शरण जावं लागलं होते.
या आंदोलनाद्वारे संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या अभंग आणि भारुडाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील आक्रोशाला वाचा फोडण्यात आली. हा प्रकार केवळ आंदोलन नव्हता, तर हा होता जनतेच्या तळमळीचा आवाज.
पण सत्ताधारी, विरोधक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सगळेच केवळ वादविवादात मग्न आहेत. एका बाजूला राजकीय खुर्च्यांची लक्तरं वाजवली जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरकरांची तहानेने बळी जात आहे.
टँकर लॉबीचा खुला नाच, प्रशासनाचा मौन आशीर्वाद
शहराला दररोज 280 MLD पाण्याची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त 130 ते 150 MLD पाणीपुरवठा केला जातो. परिणामी नागरिकांना दररोज टँकरने पाणी मागवावे लागत आहे, जे सामान्य माणसाच्या खिशावर ताण आणते आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार, टँकर लॉबीचा हस्तक्षेप आणि अकार्यक्षम पाणी व्यवस्थापन यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.
हंड्यांऐवजी नळातून पाणी दे, नाहीतर खुर्ची खाली कर!
ज्यांच्या हातात शहराच्या नळांची नाडी होती, त्यांनीच ती टँकर लॉबीच्या गळ्यात अर्पण केली! शहराला 280 MLD पाण्याची गरज असताना, केवळ 130 ते 150 MLD पाणी पुरवले जाते. उर्वरित गरज टँकरच्या टाळक्यांवर सोडली आहे!
शहरात सत्तेवर असलेल्यांना आणि विरोधकांनाही पाणी प्रश्नाचे गांभीर्य आहे, पण उपाययोजना करताना मात्र केवळ ‘आश्वासनांची टँकर’ पुरवली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने अद्याप हवेतच विरली आहेत. आता नागरिकांना पुन्हा एकदा नव्या लढ्याची तयारी करावी लागत आहे.
पाण्याचे हक्काचे नळ आता श्रीमंतीच्या दरवाजाशी थांबतात, गरिबांच्या गल्ल्यांमध्ये मात्र रिकाम्या बादल्या नजरेस पडतात. हे केवळ प्रशासनाचे अपयश नाही, तर माणुसकीवरचा कलंक आहे.
पालकमंत्र्यांचे मौन, विरोधकांचे ढोंग
शहराशी जिव्हाळा नसलेले मंत्री, पालकमंत्री कधीच या प्रश्नाकडे फिरकत नाहीत. आणि ज्या विरोधकांनी आक्रोश मोर्चा काढून लोकांना खोट्या आश्वासनांच्या गोड गोष्टी सांगितल्या, त्यांनीच आता पाठमोरे व्हावे हा तर दुर्दैवाचा शोकांत आहे.
पाणी फक्त गरज नाही, अस्तित्वाचा आधार
पाणी हे जीवनाचा मूलभूत हक्क आहे. जेव्हा एखाद्या शहराला स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळते, तेव्हा त्या समाजाची प्रतिष्ठा, आरोग्य आणि भविष्य सगळं धोक्यात येतं.
पाणी आमचा जन्महक्क — कुठल्याही राजकीय सौद्याने विकता येणार नाही!
पाणी म्हणजे फक्त जीवनच नाही, तर स्वच्छता, आरोग्य, शेती, उद्योग आणि मानवी प्रतिष्ठेचा कणा आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अधिकार दिला आहे. आज पाणीटंचाईमुळे संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे.
पाणी वाचवण्याच्या गप्पा सर्वत्र चालतात, पण प्रत्यक्षात शहरांचा श्वास टँकर लॉबीच्या दयेवर का अवलंबून राहतो? हा मोठा प्रश्न आहे. आज संभाजीनगर टंचाईने होरपळतंय, उद्या संपूर्ण महाराष्ट्र पेटेल!
महाराष्ट्राची तहान: सततचं संकट
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. जायकवाडी धरण ही संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याची प्रमुख व्यवस्था असली, तरी धरणातील जलसाठा कमी असतो किंवा तो प्रभावीपणे वितरित होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या १००० पेक्षा अधिक गावांमध्ये टंचाई घोषित केली गेली आहे. केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही, तर मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भाग दरवर्षी पाण्यासाठी रडकुंडीला येतात.
धरणात पाणी नाही, योजनांचे अर्धवट काम, जलसंधारणाचे फसवे उपक्रम — सगळं काही फक्त कागदावरच!
म्हणूनच आता पुरे झाले ‘आश्वासनांचे पाणीपुरवठे’!
नागरिकांचा संघर्ष केवळ रिकाम्या हंड्यांपुरता मर्यादित राहू नये, तर तो नळांमधून थेट जलप्रवाह सुरू होईपर्यंत अखंड सुरू राहिला पाहिजे.
पाणी हक्कासाठी आता संघर्षाला तडाखेबाज वळण द्यायची वेळ आली आहे!
पुढील दिशा काय?
दिर्घकालीन उपाययोजना आवश्यक: जलसंधारण, जलपुनर्भरण (water recharge), आणि जलस्रोत व्यवस्थापन यावर भर द्यावा लागेल.
जलयुक्त शिवार योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनिक पारदर्शकता याशिवाय पाणी प्रश्न सुटणे अशक्य आहे.
जनतेच्या सहभागाने जलप्रश्न सोडविण्याची गरज आहे.
आज छत्रपती संभाजीनगर तहानले आहे. उद्या जर आपण पाणी व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला ही किंमत मोजावी लागेल.
पाणी वाचवा, भविष्य वाचवा!
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील पाकिस्तानी सिंधी समाजाला घाबरण्याचं, देश सोडण्याची गरज नाही – देवेंद्र फडणवीस
- भारत-पाक तणाव शिगेला; या देशाने पाकिस्तानला पाठवला मोठा दारुगोळा आणि फायटर जेट्स
- ‘छावा’ पाहून विजय देवरकोंडा भडकला; म्हणाला, “औरंगजेबाच्या कानाखाली वाजवेन!”