Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत. सरकारकडून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना पुढे करून आश्वासने दिली जातात. मात्र, त्यानंतर दिलेला शब्द पूर्ण केला जात नाही. महायुती सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, हीच वस्तुस्थिती आहे,” असा आरोप भास्कर जाधव यांनी फडणवीस सरकारवर केला आहे.
Bhaskar Jadhav on Maratha reservation
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारमधील कोणत्याही नेत्यावर आता जरांगे पाटील यांचा विश्वास राहिलेला नाही, यावेळी आपण जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. प्रत्येकवेळी नवा शासन निर्णय काढून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर विश्वासघात होतो, असा दावा करत जरांगे पाटील उद्विग्न झाल्याचेही जाधव म्हणाले.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. चर्चेसाठी पुढाकार घेण्याबाबत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची अद्याप प्रतीक्षाच केली जात आहे. अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्यामुळे, जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे यांनी मराठा समाजाला १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी समूहाने प्रवास करण्याऐवजी स्वतंत्रपणे मुंबईकडे निघावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंचं मोठं आवाहन; ‘गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा’
- मतदार याद्यांवरून संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
- ‘१२ तारखेपर्यंत हळूहळू मुंबईत घुसा’; मुंबईत २५ लाख मराठे जमवण्यासाठी जरांगेंची नवी रणनीती!












