🕒 1 min read
Atul Save vs Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे (भाजपा) उमेदवार अतुल सावे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून पदयात्रा, कॉर्नर बैठकाघेत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. या भेटीत ते आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडत आहेत.
या मतदार संघात महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून लहू शेवाळे हे मैदानात आहेत. तर एमआयएमकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले इम्तियाज जलील हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यावेळी पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयआयचे गफ्फार कादरी यांनी भाजपचे श्री. सावे यांना कडवी झुंज दिली होती. तेव्हा सावे यांनी कादरी यांचा पराभव करीत विजय मिळवला. कादरी हे दोन नंबरवर राहिले. आता लोकसभेला पराभव झाल्याने काही गणिते घेऊन जलील हे आपला पूर्वीचा ‘छत्रपती संभाजीनगर मध्य’ हा विधानसभा मतदारसंघ सोडून पूर्व मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच कादरी हे देखील निवडणुकीत उभे आहेत. मात्र, त्यांच्या तुलनेत महायुतीच्या अतुल सावे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
या मतदारसंघात काँगेसकडून सुरवातीला माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. तशी घोषणा देखील काँग्रेसकडून अधिकृतरित्या करण्यात आली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देशमुख यांचे नाव वगळून अलीकडे कॉंग्रेसवासी झालेल्या लहू शेवाळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. असे असताना याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनीही पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांनीही आपला अर्ज दाखल केला होता. तसेच श्री. देशमुख यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज केला होता. मात्र, शेवटच्या दिवशी या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले.
मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्षात अतुल सावे, इम्तियाज जलील, लहू शेवाळे, कादरी यांच्यातच ही लढत होणार आहे. या सर्वांच्या तुलनेत अतुल सावे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्या बाजूने उळवले असल्याचे पाहायला मिळत आहेत.
थेट संवाद साधण्यावर भर
बुधवारी गारखेडा परिसरातील रेणुका नगर, रानवारा सोसायटी, क्रेडाई संघटना, न्यायनगर, खान्देशी मित्र मंडळ, गुजराती समाजाच्या बैठका घेत नागरिकांशी संवाद साधत सावे म्हणाले, मागील १० वर्षांमध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी रस्ते, ड्रेनेज, आणि पाण्याची समस्या सोडवण्यास पुढाकार घेतला. मूलभूत गरजांसाठी प्रकल्प राबवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात विविध सुधारणा झाल्या आहेत. विकासाचा हा वारसा पुढे नेत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण मला साथ द्यावी, असे आवाहन केले आहे.
Atul Save vs Imtiaz Jaleel Maharashtra Vidhan Sabha Election
महत्वाच्या बातम्या
- महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
- ईव्हीएम वर ‘मॉकपोल’ करून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली खात्री
- छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











