MP CM resignation letter: कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP Abhijeet Dipke) संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी थेट मध्य प्रदेशचे ‘मुख्यमंत्री’ म्हणून उपहासात्मक राजीनामा पत्र शेअर करत राज्य सरकारला टोला लगावला आहे. बालाघाटमध्ये संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या दिपके यांना आदल्या दिवशी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी घेराव घातला होता. त्यानंतर त्यांनी हे खोचक राजीनामा पत्र पोस्ट केले आहे.
दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खऱ्या वाटणाऱ्या राजीनाम्याचे पत्र शेअर केले. “मी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून तत्काळ राजीनामा देत आहे. मला मध्य प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो. या संधीचा फायदा घेण्यात मी स्पष्टपणे अपयशी ठरलो आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या राजीनाम्यात त्यांनी सागर जिल्ह्यातील कथित विषारी दारू प्रकरण आणि बालाघाटमधील मुलांचे मृत्यू यांसारख्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपयशावर निशाणा साधला आहे. यावर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही गमतीत ‘दिपके जबाबदारीतून पळ काढत आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली.
Abhijeet Dipke shares satirical MP CM resignation letter
बालाघाटमध्ये इन्फ्लुएन्सरकडून दिपके यांना घेराव
संसर्गजन्य आजारांमुळे कथित मृत्यू झालेल्या आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आणि स्थानिक आरोग्य सुविधांची माहिती घेण्यासाठी दिपके यांनी शनिवारी बालाघाटमधील अदोरी, कोरका आणि बोंडरी गावांना भेट दिली होती. यावेळी एका महिला ‘इन्फ्लुएन्सर’ने त्यांच्या तोंडासमोर माईक धरून ‘इथे मृतदेहांवर राजकारण करायला आला आहात का?’ आणि ‘इतक्या उशिरा का आलात?’ असा जाब विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर आपण उशिरा आल्याबद्दल दिपके यांनी माफी मागितल्याचेही व्हिडिओत ऐकू येते. “इथे चांगला रस्ता झाला आहे, तो तुम्हाला दिसत नाही का?” असेही ती महिला विचारत होती. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी दिपके यांना दुसऱ्या गाडीत बसवून तेथून सुरक्षित बाहेर काढले. दिपके निघून जाताना ती महिला ‘पळाला, पळाला’ असे म्हणताना ऐकू येत आहे. दुर्गम भागात बाहेरून आलेल्या या इन्फ्लुएन्सरना पाहून स्थानिक पत्रकारांनीही आश्चर्य व्यक्त केले आणि दिपके यांचा दौरा उधळून लावण्यासाठीच त्यांना कोणी पाठवले होते का, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, बालाघाट परिसरात ३० हून अधिक मुलांच्या मृत्यू प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या याचिकेनुसार, मुलांना पुरेसे उपचार मिळत नसून ५० खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयात सुमारे ४०० मुलांवर उपचार केले जात असल्याचा आरोप आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून त्यामुळेच संसर्ग पसरून मुलांचे मृत्यू होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या उपहासात्मक पत्रात उल्लेख केलेल्या सागर जिल्ह्यातील बांदा परिसरातील कथित विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘फोमेपिजोल’ (Fomepizole) या अँटीडोटचा वापर महत्त्वपूर्ण ठरला असून, त्यामुळे आतापर्यंत ३० हून अधिक जणांचे प्राण वाचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक
- भोकरदन SDPO कार्यालयातील लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाचा दिलासा; कंत्राटी सेवा राहणार सुरू
- पैठणमधील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती; रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











