नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि म्हटले की, संसदेचे कामकाज सुरळीत चालू न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कंगना राणौत काय म्हणाल्या?
संसदेतील विरोधकांच्या निदर्शनांवर भाष्य करताना कंगना राणौत म्हणाल्या, “विरोधकांनी असा निर्णय घेतला आहे की, मुद्दा कितीही महत्त्वाचा असला तरी ते सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत. आजही, जेव्हा शिक्षण सुधारणांशी संबंधित विधेयक मांडण्यात आले, तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला. शिक्षण सुधारणेसारख्या महत्त्वपूर्ण विधेयकाला संसदेत विरोध झाला आणि ते विधेयक मांडलेही जाऊ नये, अशी मागणी केली गेली, हे देशाला समजले पाहिजे. त्यांचा एकमेव उद्देश हा आहे की देशात कोणतेही काम होऊ नये आणि विकास प्रक्रिया खुंटली जावी, कारण जनतेने त्यांना सरकार चालवण्याचा कौल दिलेला नाही. म्हणूनच ते अशा प्रकारचे राजकारण करत आहेत.”
पंतप्रधान मोदींचे कौतुक
त्या पुढे म्हणाल्या, “आमचे पंतप्रधान (PM Narendra Modi) संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. ते असे नेते आहेत जे देशातील जनतेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यासाठी – मग तो लहान असो वा मोठा – पूर्णपणे समर्पित आहेत. तुमच्या लक्षात आले असेलच की, परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे, जो ही यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करेल. शिवाय, परीक्षा सुधारणांबाबतचे विधेयकही त्वरित मांडण्यात आले. यावरून पंतप्रधानांची कटिबद्धता दिसून येते.”
राहुल गांधींवर टीका
राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधताना कंगना राणौत म्हणाल्या की, ते सध्या राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी आहे. राहुल गांधींनी युपीए (UPA) सरकारच्या कार्यकाळात शिक्षणासाठीचे बजेट किती होते, याकडे पाहिले पाहिजे. त्यावेळी शिक्षणासाठी केवळ नाममात्र तरतूद केली जात असे.”
“माझ्या संपूर्ण आयुष्यात मी असे कधीच पाहिले नाही…”
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओवरही कंगना यांनी प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओमध्ये Gen Z मधील आंदोलक निदर्शनादरम्यान अपशब्द वापरताना दिसत होते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतकी नकारात्मकता आणि कुरूपता कधीच पाहिली नाही. ‘Gen-Z’ पिढीच्या निदर्शनांशी संबंधित या ‘रील्स’ (Reels) पाहणे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. लोक ज्या प्रकारे बोलत आहेत आणि जी भाषा वापरत आहेत, ती मला अत्यंत आक्षेपार्ह आणि असभ्य वाटते. प्रत्येक दृश्यात (फ्रेममध्ये) अशा प्रकारचा उर्मटपणा आणि गैरवर्तन पाहणे खरोखरच क्लेशदायक आहे. लोकांमध्ये अशी मानसिकता आणि वागणूक कोठून येते, हे मला अजिबात समजत नाही.”
सोशल मीडियापासून काही काळ विश्रांती
तिने सांगितले की, मानसिक शांततेसाठी ती काही काळ सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. तिने लिहिले, “भारत नेहमीच आपली विविधता, सौंदर्य, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यासाठी ओळखला जातो; मात्र, जेव्हा लोक एकमेकांचा अपमान करतात आणि अशा प्रकारचे वर्तन करतात, तेव्हा ते आपल्या संस्कृतीच्या प्रतिष्ठेच्या पूर्णपणे विरोधात असते. या रील्स पाहून मी खूप अस्वस्थ झाले आहे. स्वतःला शांत करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य पुन्हा मिळवण्यासाठी मला काही काळ सोशल मीडियापासून दूर राहण्याची गरज आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP चा सरकारला अल्टिमेटम! आंदोलकांवरील कारवाई थांबवा, अन्यथा…
- मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा पेटणार? 29 जुलैला मनोज जरांगे करणार मोठी घोषणा
- E20 इंधन वादात नितीन गडकरींना कोर्टाचा मोठा दिलासा! सोशल मीडिया पोस्टवर कारवाईची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












