🕒 1 min read
मुंबई – एखाद्या अधिकाऱ्याची निवृत्ती हा सहसा भावूक क्षण असतो, पण राजकारणात संधी मिळेल तिथे विरोधकांना घेरलं जातं, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय, राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची निवृत्ती! ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्ला यांनी आज वर्दी उतरवली. पण त्यांच्या निरोप समारंभापेक्षा चर्चा रंगलीये ती काँग्रेसने मारलेल्या एका बोचऱ्या टोमण्याची. काँग्रेसने थेट “सत्ताधाऱ्यांचा True Caller आज सेवानिवृत्त झाला,” अशा शब्दांत त्यांना निरोप दिला आहे.
रश्मी शुक्ला आणि वाद हे जणू समीकरणच बनलं होतं. महाविकास आघाडीच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणावरून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, गुन्हेही दाखल झाले होते. राज्यात सत्तांतर होताच हे गुन्हे रद्द झाले आणि त्यांना थेट पोलीस महासंचालक पद मिळालं. काँग्रेसने नेमकं याच दुखऱ्या नसवर बोट ठेवलंय. काँग्रेसने रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत खोचक ट्वीट केलं आहे. निवडणुकीच्या काळातही पक्षपाताच्या आरोपामुळे निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती, हे विशेष.
Maharashtra DGP Rashmi Shukla retires
जाता-जाता काय म्हणाल्या शुक्ला?
एकीकडे राजकीय टोलेबाजी सुरू असताना, दुसरीकडे रश्मी शुक्ला यांनी आपल्या कामाचा हिशोब मांडला. “गेल्या दोन वर्षांत सणवार आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. गडचिरोली आणि गोंदियातील नक्षलवाद कमी करण्यात आम्हाला यश आलं,” असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. हे यश एका व्यक्तीचं नसून संपूर्ण पोलीस दलाचं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सदानंद दाते नवे ‘बॉस’
दरम्यान, मुंबईतल्या भोईवाडा मैदानात शुक्ला यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता राज्याच्या पोलीस दलाची सूत्रं सदानंद दाते यांच्या हाती आली असून, त्यांनी आज रश्मी शुक्लांकडून पदभार स्वीकारला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “राज ठाकरेंचं अस्तित्व संपणार…”; शहाजीबापूंचं ‘ते’ भाकीत आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!
- ‘काय ती झाडी…’ फेम शहाजीबापू मुंबईत; संजय राऊतांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले, “कस्पटासारखं उडवेन!”
- ‘ते’ काम अजित पवार करतायत, आपल्याला गरज नाही; उदय सामंतांनी भाजपला दाखवला आरसा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












