🕒 1 min read
मुंबई: महागाईच्या काळात प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या (150 किमी पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना (सवलतधारक वगळून) तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.
कमी गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना तिकीटामध्ये 15 टक्के सूट मिळेल. ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी लागू असली तरी, ती केवळ पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच आहे. प्रवाशांना या योजनेचा लाभ दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर घेता येणार आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच प्रवाशांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
MSRTC Advance Booking Discount
येत्या आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण करणाऱ्या भाविकांनाही 1 जुलैपासून 15 टक्के सवलत लागू होईल. मात्र, जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या लोकप्रिय ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा सर्वाधिक लाभ घेता येईल. प्रवाशांना एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (npublic.msrtcors.com) किंवा MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करता येईल. तसेच, प्रत्यक्ष तिकीट खिडकीवरही ही सवलत उपलब्ध असेल.
काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने 15 टक्के भाडेवाढ केली होती, ज्याचा फटका लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बसला होता. आता या नवीन निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून, यामुळे एसटीचे प्रवासी वाढतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिझेलचे टेन्शन विसरा! आता फक्त दीड लाखात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तुमचा, सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
- “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं…हे सगळे दुटप्पी लोक” फडणवीसांचा ठाकरेंना चिमटा
- देवेंद्र फडणवीस मंचावर असताना सरन्यायाधीश गवईंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










