🕒 1 min read
मुंबई, दि. ८ जुलै २०२४ | Nana Patole Vs Eknath Shinde | मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, असा घणघाती हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत.
मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेग्या पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली, नालेसफाई केली असा सरकारचा दावा आहे तो या पावसाने खोटा ठरवला.
मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभा राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे. नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली. एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण आहे.
मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिणींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार, असे नाना पटोले म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. पुण्यातील पोर्श अपघातातून सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. वरळीत एका महिलेला भरधाव गाडीने चिरडले. ही कार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला. शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला आहे, मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही पाठीशी घालणार नाही पण त्यांना कशाचेही गांभीर्य नाही.
महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात अधिकारीही सुरक्षित राहिले नाहीत. पुण्यात वाहतूक शाखेच्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला, महाराष्ट्र गुंडाराज व माफिया राज करुन ठेवले आहे. सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप, पैसे घेऊन बदल्या करणे अशा प्रकारांमुळे प्रशासन काम करत नाही त्याचे परिणाम जनेतेला भोगावे लागत आहेत. सरकारला जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल, असेही नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी ; विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरणार
- अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका; जामिनावरील पुढील सुनावणी २६ जूनला
- विधानसभेसाठी शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; ‘चिन्हासाठी’ निवडणूक आयोगात धाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











