🕒 1 min read
नाशिक– राजकारणात टीका टिपणी चालतच असते, पण काही वार थेट काळजाला लागणारे असतात. नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी असाच एक ‘पर्सनल’ वार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. “ज्यांना स्वतःला पोरं होत नाहीत, ते आमची पोरं दत्तक घेतायत, हे काय शहरं दत्तक घेणार?” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फडणवीसांच्या ‘नाशिक दत्तक’ योजनेची खिल्ली उडवल्याने आता भाजप आणि ठाकरे गटामध्ये ठिणगी पडणार हे नक्की!
Uddhav Thackeray Speech Nashik
नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी पक्षाची तुलना थेट ‘दलालांशी’ केली. ते म्हणाले, “भाजप हा आता निष्ठावानांचा राहिला नसून तो उपटसुंभांचा आणि दलालांचा पक्ष झालाय.” इतकेच नाही तर, भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना डोक्यावर घेतलं जातंय आणि निष्ठावान मात्र रडत आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपच्या माजी आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना भरसभेत सहानुभूती दाखवली. “देवयानी ताईंबद्दल मला आदर आहे, त्यांना आज रडू आलं, कारण त्यांचा पक्ष आता उपऱ्यांच्या हातात गेलाय,” असा टोलाही त्यांनी लगावला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी भाजपला आरसा दाखवला. राम मंदिराचा डंका पिटता, पण प्रभू रामचंद्रांच्या तपोवनातील झाडं तोडताना तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “तुमच्या पक्षाच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढा आणि मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा,” असं म्हणत त्यांनी भाजप-एमआयएम (MIM) युतीवरूनही जोरदार प्रहार केला.
या सभेत सर्वात महत्त्वाचा क्षण तो होता जेव्हा उद्धव यांनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) उल्लेख ‘माझा भाऊ’ असा केला. “पराभव होऊनही सेना संपली नाही, कारण आज माझा भाऊ राज माझ्यासोबत आहे,” असं सांगताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. राहुल नार्वेकर असो वा निवडणूक आयोग, हे सगळे शेपूट घालून बसलेत, पण जनताच आता यांना धडा शिकवेल, असा विश्वासही ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “टांगा पलटी, घोडे फरार..!”; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना ‘अल्टिमेटम’; नवी मुंबईत महायुतीतच ‘महायुद्ध’!
- पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











