Rahul Gandhi Vs Narendra Modi | कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सभेला संबोधित करताना गांधी यांनी भाजपाकडून संविधान संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेधकाला विरोध केला होता, त्याविरोधात महाराज लढत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. मात्र, भाजपाकडून याच संविधानला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातातून अनावरण झालेला पुतळा कोसळला, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनीच (भाजप) राम मंदिर, संसदेत आदिवासी राष्ट्रपतींना उद्घाटनाला बोलावलं नाही. हीच यांची विचारधारा आहे.
नेमंक काय म्हणाले राहुल गांधी?
“आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही”
“शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे”, असंही राहुल गांधी म्हणाले.
भाजपाच्या विचारधारेनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेधकाला विरोध होता
पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.
Rahul Gandhi Vs BJP Narendra Modi
पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. “भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं संविधान कसं संपायचं यासाठी प्रयत्न करतात. भाजपाचे लोक भारतातील विविध संस्थांवर आक्रमण करतात. लोकांना घाबरतात आणि इतकं करूनही परत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तर नतमस्त होत असाल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावंच लागेल”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या