🕒 1 min read
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील राजकीय संकट कायम असतानाच आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षांतरानंतर ठाकरे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे,” असे वक्तव्य करत राऊत यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य केले.
सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले,” अशा शब्दांत त्यांनी अहिरांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, पक्षाने सर्व काही दिल्यानंतरही कोणी सोडून जात असेल, तर त्यामागे राजकीय लालसा कारणीभूत ठरते. असे कार्यकर्ते दाखवा ज्यांना कोणत्याही पदाची किंवा स्वार्थाची अपेक्षा नाही, असेही त्यांनी म्हटले. राज्यात राजकीय नासाडी आणि अधःपतन सुरू असल्याची टीका करत राऊत यांनी पक्षासोबत कायम राहणारे कार्यकर्ते दुर्मिळ असल्याचे सांगितले.
सचिन अहिरांच्या संदेशावर राऊतांचा सवाल
सचिन अहिर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपल्या सहकाऱ्यांना संदेश दिला होता. “पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे. माझ्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी हे करत आहे,” असे अहिरांनी म्हटल्याचे सांगितले जाते. यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर नेते स्वतःच्या भविष्यासाठी पक्ष सोडत असतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करायचे? राऊत यांनी सांगितले की, सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांना योग्य सन्मान देत होते. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित केले जात होते, असे म्हणता येणार नाही.
शरद पवारांचा संदर्भ देत राऊतांचा हल्ला
संजय राऊत यांनी सचिन अहिर यांच्या जुन्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत शरद पवार (Sharad Pawar) यांचाही उल्लेख केला. राऊत म्हणाले की, यापूर्वीही अहिर यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. पवारांनी त्यांना मोठ्या संधी दिल्या, मंत्रीपद दिले आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पवारांना सोडून शिवसेनेत प्रवेश केला. “जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होणार?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, पक्षाची ताकद ही मूळ कार्यकर्त्यांमुळे वाढते. येणारे-जाणारे नेते हे कायम पक्षाचे आधारस्तंभ नसतात. त्यामुळे आता सर्वांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचे राऊत यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- Fuel Price Cut: पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले; जाणून घ्या नवीन दर आणि कपातीचे कारण
- LPG Price Cut: व्यावसायिक गॅस सिलिंडर 183 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर
- शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; एकनाथ शिंदे आज दिल्लीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












