🕒 1 min read
मुंबई : यंदा उशिराने सक्रिय झालेला मान्सून आता महाराष्ट्रात जोर धरताना दिसत आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या India Meteorological Department (IMD) अंदाजानुसार, कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिवसांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
मुंबईत पुढील 5 दिवस पावसाचा जोर
मुंबईत पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी शहराला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईकरांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
हवामान विभागाने पुढील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे:
- रत्नागिरी – आज रेड अलर्ट
- पालघर – 2 जुलै
- रायगड – 3 आणि 4 जुलै
- ठाणे – 4 जुलै
- सातारा घाट परिसर – 5 जुलै
- पुणे घाट परिसर – 2, 3 आणि 4 जुलै
या काळात संबंधित भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
उशिराने का होईना, पण समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने राज्यातील शेतकरी सुखावला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; किमतीत झाली मोठी घसरण!
- प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ नं ओलांडला 100 कोटींचा टप्पा; अभिनेता प्रसाद ओक म्हणाला…
- राम कपूरचा ‘लॉकअप’मध्ये धक्कादायक प्रताप; थेट २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएंसरला केलं किस!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












