🕒 1 min read
पुणे – गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जी कुजबूज सुरू होती, त्यावर अखेर दादांनी पडदा टाकलाय. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एक होणार का? या प्रश्नाने राजकीय विश्लेषकांसह कार्यकर्त्यांचीही झोप उडवली होती. पण, पुण्यात Ajit Pawar यांनी जे विधान केलंय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम तर दिलाच, पण सुप्रिया सुळेंच्या भविष्यातील भूमिकेवरही मोठं भाष्य केलं आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांमधील वाढती जवळीक पाहून विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अजित पवारांनी आज स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण (NCP Merger) होणार नाही.” इतकंच नाही तर दिल्लीच्या वर्तुळात सुप्रिया सुळेंना मंत्रीपद मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यावरही दादांनी रोखठोक उत्तर दिलं. “सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे, त्यामुळे त्या केंद्रात मंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलंय. “अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीचं आश्वासन दिलं होतं, पण ते शब्द पाळत नाहीत,” अशी टीका भाजपकडून (BJP) होत आहे. यावर दादांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “जेव्हा मी स्वतः मैदानात लढतोय, तेव्हा ती लढत मैत्रीपूर्ण कशी असेल?” असा प्रतिसवाल करत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला. मात्र, निवडणुकीनंतर पुण्यात भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर दादांनी गुलदस्त्यात उत्तर देणं पसंत केलं.
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना उद्देशून “काहीजण फुकटची आश्वासनं देऊन मला बाजीराव म्हणा म्हणतात,” असा टोला लगावला होता. याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. “पहिले बाजीराव पेशवे कर्तृत्ववान होते, त्यांनी मनगटाच्या जोरावर कारभार केला,” असं म्हणत त्यांनी पलटवार केला. शेवटी मतदारांना आवाहन करताना अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी अलार्म बंद करून कमळाचं बटन दाबायला सांगितलंय, पण मी (Ajit Pawar) म्हणतो सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा आणि मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाचंच बटन दाबा!”
📌 महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis vs Thackeray: ‘हे काय दहशत निर्माण करणार? यांच्यात आता ती क्षमता तरी उरलीये का?’; फडणवीसांचा खोचक टोला!
- ‘घरात बसून चालणार नाही, बटण दाबावंच लागेल’; मतदानानंतर सचिन तेंडुलकरचं मुंबईकरांना आवाहन!
- ‘ही सुट्टी समजून लोळत पडू नका’; पुण्याहून ३ तास प्रवास करून नाना पाटेकर मुंबईत, मतदारांना आवाहन













