Maratha reservation: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा आरपारच्या लढाईकडे वळताना दिसतोय. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आता जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. भुजबळांनी जरांगेंच्या भाषेवर आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेल्या संवादावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. पण, जरांगेंनीही आपल्या खास गावरान आणि आक्रमक शैलीत भुजबळांना थेट अंगावर घेतलं असून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांवर जरांगे अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. तसेच, महिला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी बोलतानाही त्यांनी मर्यादा ओलांडून त्यांना नर्व्हस केल्याचा दावा भुजबळांनी केला होता. यावर सडेतोड उत्तर देताना जरांगेंनी, “तू कशाला काड्या लावतो, तुला शिव्या देऊ का मग? कुठवर काड्या लावणार,” असा थेट सवालच भुजबळांना विचारला आहे.
Manoj Jarange targets Chhagan Bhujbal over Maratha reservation
‘अधिकाऱ्यांमध्ये लिंगभेद नसतो, जिल्हाधिकाऱ्यांना ऐकावंच लागेल’
जिल्हाधिकाऱ्यांशी वापरलेल्या भाषेवरून होणाऱ्या टीकेवर जरांगेंनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते, जिल्हाधिकारी या संपूर्ण जिल्ह्याच्या पालक आणि मालक असतात, त्या काही राजकारणी नाहीत. जनतेच्या मालकाला लोकांचे प्रश्न, राग किंवा संताप सहन करावाच लागतो. जर त्या हे सहन करत नसतील तर त्या जातीयवाद करत आहेत, असा अर्थ निघतो. सक्षम अधिकारी असल्यावर तिथे महिला की पुरुष असा लिंगभेद येत नाही, अशा शब्दांत जरांगेंनी आपला बचाव केला.
दुसरीकडे, जरांगेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणाऱ्या अजय बारस्कर यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. आपल्या विरोधात बोलणारे खरंच ‘ओरिजनल’ मराठे आहेत का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. दुकानात भेसळ असेल तर काय सांगणार, असा टोलाही त्यांनी लगावला. मराठा बांधवांनी आता केवळ टीव्हीसमोर न बसता हातातील कामं सोडून अंतरवाली सराटीत जमावे, असे थेट आवाहन जरांगेंनी केले आहे.
उद्या, १२ सप्टेंबर रोजी दुपारी मुंबईला जाण्याबाबतचा अंतिम निर्णय आणि वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यावर बोलताना जरांगेंनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. मागच्या वेळेपेक्षा तब्बल २५ पट अधिक मराठा समाज यावेळी मुंबईच्या दिशेने धडक मारेल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीसांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ताईने बोलावलंय, पण…’
- पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? १८०० कोटींच्या मुंढवा जमीन प्रकरणात हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
- सचिन घायाळांचा ‘सत्यमेव जयते’चा दावा फोल: साखर आणि मोलासेसचा ताबा नाहीच, साखर सहसंचालकांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











