Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. ‘राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय’, असा थेट घाव घालत राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सध्या जरांगे पाटील हे सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनले आहेत, असं राऊत यांचं म्हणणं आहे. सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या लढ्याचा आणि जरांगेंचा वापर करून घेतला. पण आता त्यांची गरज संपल्याने त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे. सलग १२ दिवस उपाशी असलेल्या एका माणसाची अशी अवस्था होणं अमानुष असल्याचा संताप राऊतांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक
दुसरीकडे, जरांगे यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. त्यावेळी मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या विनवणीनंतर त्यांनी सलाईन लावून घेण्यास होकार दिला होता. पण अन्नत्यागामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला असून शरीरातील साखरेची पातळीही घसरल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळेच एकीकडे जरांगे कुणबी प्रमाणपत्रावर ठाम असताना, सरकार आता त्यांची जास्त समजूत काढण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तसं स्पष्टच बोलून दाखवलं आहे. शासनाकडून जे काही निर्णय घेणं आवश्यक होतं ते घेण्यात आले आहेत. तरीही जरांगे पाटील समाधानी नसतील, तर आता आपल्याकडे त्यांचं समाधान करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि अंतरवाली सराटीत दोन दिवस दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर
- महाविद्यालयात अल्पसंख्याक बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती लाटली; बोगस विद्यार्थी दाखवून शासनाला गंडा












