Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने आता पुन्हा एकदा अत्यंत नाजूक वळण घेतलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष तिकडे लागून आहे. या तणावपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाची तीव्रता आणि येत्या काळात अंतरवालीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व दारूची दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आज आणि उद्या (बुधवार आणि गुरुवार) या परिसरात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल. हा निर्णय केवळ खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Manoj Jarange hunger strike Antarwali Sarati
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक
दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं असून त्यांना सतत चक्कर येत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती खूपच खालावल्याने अधूनमधून त्यांना सलाईन लावले जात आहे पण त्यांनी काहीही खाण्यास नकार दिला आहे.
त्यामुळेच आता येत्या १२ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना संबोधित करून मुंबईतील आंदोलनाबाबत नेमकी काय मोठी घोषणा करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. प्रशासनानेही या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त आणि आवश्यक ती सर्व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर
- महाविद्यालयात अल्पसंख्याक बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती लाटली; बोगस विद्यार्थी दाखवून शासनाला गंडा
- महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् अधिकाऱ्यांना मारहाण; सख्ख्या भावांचा राडा












