दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet) लवकरच खांदेपालट होणार आहे. भाजपमध्ये संघटनात्मक बदल पूर्ण झालेत. आता पुढचा नंबर थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा हा दुसरा टप्पा. सोबतच २०२९ ची लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका. हेच टार्गेट ठेवून मंत्रिमंडळात मोठ्या बदलांची तयारी सुरू झालीय.
सध्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण ६९ मंत्री आहेत. घटनेनुसार ही संख्या ८१ पर्यंत जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर, १२ मंत्रिपदं अजूनही रिक्त आहेत. पण केवळ रिकाम्या जागा भरणं, एवढाच यामागे उद्देश नाहीये. यामागे मोठं राजकीय आणि प्रशासकीय गणित दडलंय.
‘एक व्यक्ती, एक पद’ नियम कुणाला भोवणार?
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नवी टीम सज्ज झालीय. त्यामुळे पक्षात नवी जबाबदारी मिळालेल्या नेत्यांना आता ‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार मंत्रिपद सोडावं लागू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्वात मोठं नाव आहे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचं. गोयल आता भाजपचे खजिनदार आहेत. त्यामुळे त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातून मुक्त केलं जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी यांचीही अडचण वाढलीय. मल्होत्रा आता दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर चौधरींना यूपी भाजपची कमान मिळाली आहे. यूपीच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे चौधरींना पूर्ण वेळ संघटनेत द्यावा लागेल. पण, कुर्मी समाजाला थेट संदेश देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याबाबतही पक्षात एक मतप्रवाह आहे. याशिवाय, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.
आता प्रश्न आहे नव्या चेहऱ्यांचा
रिकाम्या १२ जागांवर कुणाची वर्णी लागणार? यूपी, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेना-भाजप युती अधिक भक्कम होईल. पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठीही भाजप काही नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकतं.
सर्वांत मोठी चर्चा आहे ती भाजपच्या संसदीय मंडळाची. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे यात चर्चेत आहेत. हा भाजपचा ‘जन-नेक्स्ट’ (Gen-Next) प्लॅन असल्याचं बोललं जातंय. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळेच, आगामी काळात मित्रपक्षांना खुश ठेवण्यासोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा हा मोदींचा मोठा डाव असेल. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











