🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये अद्यापही पूरस्थिती कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत रस्ते पाण्याखाली गेले, दरडी कोसळल्या आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Heavy Rain Alert Next 24 Hours)
सहा दिवसांत महिनाभराच्या पावसाची नोंद
जून महिन्यात साधारणपणे जितका पाऊस पडतो, तितका पाऊस यंदा जुलैच्या पहिल्याच सहा दिवसांत कोसळला. 1 जुलैपासून राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक शहरांमध्ये पाणी साचले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या. अनेक भागांत पाच दिवस उलटूनही पूराचे पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही.
मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल रेल्वे सेवेलाही बसला होता. गुरुवारी सकाळी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी रात्री पुन्हा पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात आज अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सून आता संपूर्ण देशभर सक्रिय झाला आहे. गुजरात आणि केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे तसेच नाशिकच्या घाटमाथा भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा ठप्प
दरम्यान, मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा तब्बल 48 तासांपासून विस्कळीत झाला आहे. याचा फटका पूर्व आणि पश्चिम भागातील हजारो नागरिकांना बसत आहे.
पावसाचे पाणी साठवून भागवत आहेत गरज
बेतुरकर पाड्यासह अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांना बादल्या, ड्रम आणि टबमध्ये पावसाचे पाणी साठवून दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी नागरिक पावसाचे पाणी गाळून आणि उकळून पिण्यासाठी वापरत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यातही अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. नदीकाठ, धरण परिसर, घाटरस्ते आणि दरडप्रवण भागात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिंदेंच्या दालनातील बैठकीवरून संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, ‘विश्वासार्हतेला तडा’
- करीना कपूरने सैफचा बीचवरील फोटो केला शेअर; ‘हॉट नवरा’ म्हणताच नेटकऱ्यांनी विचारला भन्नाट सवाल!
- तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












