🕒 1 min read
पुणे : जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात दूध भेसळीचे (Milk Adulteration) गंभीर प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईदरम्यान दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोडा (Sodium Hydroxide) आणि इतर घातक रसायनांचा वापर होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत तब्बल १२ हजार २७८ लिटर दूधाचा साठा नष्ट करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे ५ लाख २८ हजार रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, याच डेअरीवर यापूर्वीही भेसळीच्या आरोपांवर कारवाई झाली होती. सन २००७ मध्ये पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) या डेअरीवर दूध भेसळ (Milk Adulteration) प्रकरणी छापा टाकून कारवाई केली होती. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा त्याच स्वरूपाचे प्रकरण समोर आल्याने संबंधित ठिकाणी भेसळीचे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होते का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सह्याद्री डेअरीवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. पंचायत समिती सदस्यांच्या पती राजू सांडभोर यांच्या या डेअरीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आस्थापना बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित डेअरी अद्याप सुरू असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याशिवाय, शिरूर येथील कैलास लाळगे तसेच पाबळ येथील विठ्ठल जाधव आणि सतीश केंजळे यांच्याविरोधातही दूध भेसळ प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या सलग कारवायांमुळे तालुक्यातील दूध संकलन आणि प्रक्रिया व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत चिंता वाढली आहे.
ग्रामीण भागातील अनेक डेअऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी दूध भेसळीचे प्रकार सर्रास होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. दुधात विविध रासायनिक पदार्थ मिसळून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून दोषींना कठोर शिक्षा देणे, संबंधित डेअऱ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करणे आणि मालमत्ता जप्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून संशयित डेअऱ्यांवर विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक छापे टाकावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर भेसळीच्या या कथित जाळ्याचा विस्तार होऊन सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ते कलाकार नाहीत…’; गार्गी फुलेंचा रीलस्टार्सवर घणाघात, १०० रुपयांसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेला सुनावले खडेबोल
- हवामान विभागाचा मोठा इशारा; पुण्यात पाणी शिरलं, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी किती धोक्याचे?
- E20 Petrol News : E20 पेट्रोलमुळे कारचे नुकसान होते का? ARAI च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











