🕒 1 min read
नाशिक : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यामागे राजकीय आरोप-प्रत्यारोप नसून नाशिकमधील (Nashik) पूरपरिस्थितीच्या (Flood Situation) काळात घेतलेल्या एका बैठकीची (Meeting) चर्चा आहे. शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना नगरसेवकांना तातडीने बैठकीसाठी बोलावल्याने भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये अव्यक्त नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), महापौर हिमगौरी अडके (Himgauri Adke), उपमहापौर विलास शिंदे (Vilas Shinde) तसेच महापालिकेचे अधिकारी शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेत होते. अनेक नगरसेवकही आपल्या प्रभागात उतरून नागरिकांना मदत करण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी कार्यरत होते.
अशातच भाजप नेते किरीट सोमय्या नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्व नगरसेवकांना सुरू असलेली कामे बाजूला ठेवून तातडीने बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रत्यक्ष मदतकार्य करत असलेल्या अनेक नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे.
यानंतर किरीट सोमय्या यांनी महापालिका मुख्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. मतदारयादीतील नोंदींची पडताळणी, प्रक्रिया आणि पक्षाच्या संघटनात्मक तयारीबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अनेक नगरसेवक आपल्या प्रभागातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याने बैठकीला उशिरा पोहोचले किंवा उपस्थित राहू शकले नाहीत. अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती पाहून किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
या संपूर्ण घटनेनंतर पूरस्थितीच्या काळात अशा बैठकीची आवश्यकता होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील आपत्कालीन परिस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक बैठकीच्या वेळेबाबत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या नाराजीबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- NHAI ला कोर्टाचा मोठा दणका; टोल प्लाझा जप्तीचे आदेश, 20 जुलैपर्यंत अंतिम मुदत
- अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची 3 तास बंद दाराआड बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?
- शिरूरमध्ये पुन्हा दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश! नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












