🕒 1 min read
नवी दिल्ली : देशभरात E20 पेट्रोल लागू झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर आणि मायलेजवर याचा काय परिणाम होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI Report) च्या चाचणी अहवालातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, E20 पेट्रोलमुळे सर्व वाहनांचे नुकसान होत नाही. मात्र, E10 पेट्रोलसाठी डिझाइन केलेल्या जुन्या कारमधील काही रबरचे भाग दीर्घकाळ वापरानंतर प्रभावित होऊ शकतात.
जुन्या कारमधील रबरचे पार्ट्स धोक्यात?
ARAI च्या चाचण्यांनुसार, E10 सुसंगत जुन्या वाहनांमध्ये वापरण्यात आलेले रबर होज, गॅस्केट, सील आणि O-Rings हे E20 पेट्रोलच्या सतत वापरामुळे कालांतराने झिजू शकतात किंवा खराब होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात हे भाग बदलण्याची गरज पडू शकते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे इंजिनमधील धातूचे (Metal) भाग किंवा इतर महत्त्वाच्या धातूच्या घटकांवर कोणताही गंभीर नकारात्मक परिणाम आढळलेला नाही.
इंजिन चाचण्यांमध्ये काय आढळले?
ARAI ने विविध प्रकारच्या चारचाकी वाहनांच्या इंजिनवर सखोल चाचण्या घेतल्या.
- एका BS-4 इंजिनने E20 पेट्रोलवर समाधानकारक कामगिरी केली.
- BS-6 टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये सुमारे 265 तासांच्या चाचणीनंतर काही तांत्रिक समस्या दिसून आल्या.
- एका वाहन उत्पादक कंपनीच्या इंजिनने 400 तासांच्या चाचणीत कोणतीही अडचण दाखवली नाही.
- तर दुसऱ्या कंपनीच्या इंजिनमध्ये 809 तासांच्या चाचणीनंतर Exhaust Valve मध्ये Thermo-Mechanical Failure आढळले.
तज्ज्ञांच्या मते, केवळ या निष्कर्षांवरून E20 पेट्रोललाच जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, कारण इंजिनची विश्वासार्हता तपासण्यासाठी साधारण 2,000 तासांपर्यंत चाचण्या घेतल्या जातात.
दुचाकींवर मोठा परिणाम नाही
तीन प्रमुख दुचाकी उत्पादक कंपन्यांच्या चाचण्यांमध्ये E20 पेट्रोलमुळे कोणतीही गंभीर समस्या आढळली नाही. रिपोर्टनुसार, इंजिन स्टार्टिंग सामान्य राहिले, वाहनाची कार्यक्षमता कायम राहिली, प्रदूषणाच्या पातळीत मोठा फरक दिसला नाही. मात्र, इंधनाचा वापर 2 ते 6 टक्क्यांनी वाढू शकतो, म्हणजेच काही वाहनांमध्ये मायलेज किंचित कमी होण्याची शक्यता आहे.
देशभरात E20 पेट्रोलची अंमलबजावणी
एप्रिल 2025 पासून देशभरात E20 पेट्रोलची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते. सरकार भविष्यात E22, E25, E27 आणि E30 सारख्या अधिक इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे विशेषतः 2012 पूर्वीची वाहने आणि एप्रिल 2023 पूर्वीची अनेक मॉडेल्स वापरणाऱ्या वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
वाहन कंपन्यांचा दावा काय?
मारुती सुझुकी, टोयोटा, ह्युंदाई, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो यांसारख्या आघाडीच्या वाहन कंपन्यांनी E20 सुसंगत वाहनांवर अनेक वर्षे चाचण्या केल्याचा दावा केला आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नियमित देखभाल केल्यास E20 पेट्रोल सुरक्षित असून त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये E20 मुळे इंजिन किंवा इतर महत्त्वाच्या भागांचे नुकसान झाल्याचा ठोस पुरावा आढळलेला नाही.
सरकारचा उद्देश काय?
सरकारच्या मते, E20 पेट्रोलमुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. प्रदूषणात घट होईल. इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मात्र, जुन्या वाहनांच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेबाबत आणि मायलेजबाबत वाहनधारकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- EPFO Interest Credit 2026 : PF खातेदारांसाठी गुड न्यूज! जाणून घ्या पैसे कधी येणार
- २५ कोटींच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर; ‘सिनेमाची इतकी भीती का?’
- Jayant Patil-Vinod Tawde Meeting : राजकीय चर्चांना उधाण; महायुतीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची भूमिका काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












