अंतरवाली सराटी, 14 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसण्यावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. या झटक्यानंतर जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलत मोठा निर्णय घेतला आहे. आता आपण एकटेच मुंबईला जाणार असून, आझाद मैदानात फक्त एका व्यक्तीला उपोषणाची परवानगी द्यावी, असा नवा अर्ज दाखल करण्याच्या सूचना त्यांनी सहकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांना पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही जवळपास सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या मागण्या न्यायालयात प्रलंबित आहेत, त्याबाबत घटनात्मक चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेता येणार नाही. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन केल्यास भाविकांची गैरसोय होईल, त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Manoj Jarange on Maratha Reservation Mumbai protest
आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार का?
आझाद मैदान पोलिसांनी (Mumbai Police) परवानगी नाकारताना अनेक कायदेशीर आणि सुरक्षेची कारणे दिली आहेत. जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 45 लाख वाहने मुंबईत आणण्याचे आणि ‘गनिमी काव्याने’ पोहोचण्याचे आवाहन केले होते. अर्जात दाखवलेली आंदोलकांची संख्या आणि प्रत्यक्ष आवाहनातील संख्या यात मोठी तफावत असल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, ‘आमरण उपोषण’ हे 2025 च्या नव्या नियमावलीचा थेट भंग करणारे आहे.
सध्या मुंबईत 26 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव सुरू असून, या काळात अलोट गर्दीमुळे शहराला नेहमीच राष्ट्रविघातक शक्तींचा धोका असतो. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था ठप्प होऊ नये, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर दुसऱ्या जागेसाठी अर्ज केल्यास त्याचा विचार केला जाईल, असेही पोलिसांनी सुचवले आहे.
दरम्यान, जरांगे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. “आता मला एकट्याला खिंड लढवू द्या. मी 15 सप्टेंबर रोजी एकटाच मुंबईला निघणार आहे. मराठा समाजाने जमवलेली वाहने आणि वर्गणीचे पैसे सध्या तसेच ठेवावेत, रस्ता मोकळा झाल्यावर मी तुम्हाला मुंबईत बोलावून घेईन,” असे आवाहन त्यांनी केले. जरांगे हे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून निघून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली असा मुक्काम करत 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा खासदार ओमराजेंना थेट सवाल, ऑडिओ क्लिप व्हायरल
- शफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक; मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
- भारताचा महिला आशिया चषकावर 8 व्यांदा कब्जा, मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











