मुंबई महामोर्चा: मराठा आरक्षणाच्या लढाईने आता थेट राज्याच्या राजधानीकडे आपला मोर्चा वळवला आहे. येत्या १५ सप्टेंबरला ‘मराठ्यांचा महासागर’ मुंबईकडे धडकणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून केली आहे. विशेष म्हणजे, ऐन गणेशोत्सवात आणि विसर्जनाच्या तोंडावर हा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची डोकेदुखी आता चांगलीच वाढणार आहे.
जरांगे यांनी या महामोर्चाची अधिकृत रूपरेषा जाहीर केली. “गणपती बसवायचा आणि निघायचं,” असा थेट आदेशच त्यांनी समाजबांधवांना दिला आहे. यावेळी जरांगे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही. जिथं अडवाल तिथं…” असा खणखणीत इशारा देत त्यांनी सरकारला उघड आव्हान दिलं आहे.
Manoj Jarange announced Maratha Morcha route to Mumbai
मनोज जरांगेंचा मुंबई महामोर्चा: असा असेल संपूर्ण मार्ग
हा मोर्चा सलग पाच दिवस प्रवास करत मुंबईत पोहोचणार आहे. दररोज सुमारे १०० किलोमीटरचा टप्पा पार केला जाईल. १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता अंतरवालीतून निघाल्यावर पहिला मुक्काम बीडच्या पाटोदात असेल. त्यानंतर १६ तारखेला श्रीगोंदा (अहिल्यानगर), १७ ला पुण्यातील हडपसर आणि १८ तारखेला रायगडच्या खोपोलीत हा मोर्चा विसावेल. त्यानंतर १९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता थेट आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू होईल.
या प्रवासात ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही, त्यांनी किमान रस्त्यावर येऊन आशीर्वाद द्यावेत, असं आवाहन जरांगे यांनी केलंय. तसंच, ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत त्यांनी चार दिवसांचं डिझेल भरून आंदोलकांना मुंबईच्या वेशीपर्यंत सोडावं आणि परतावं, अशी सादही त्यांनी समाजाला घातली आहे. तुमच्या एका मदतीमुळे लेकराबाळांच्या आयुष्याचं सोनं होईल, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
दुसरीकडे, आक्रमक इशाऱ्यासोबतच जरांगे यांनी आंदोलकांना अत्यंत कडक आचारसंहिताही आखून दिली आहे. मुंबईतून आरक्षण मिळेपर्यंत कोणीही दगडफेक किंवा जाळपोळ करायची नाही. वाहने अत्यंत शिस्तीत आणि शांततेत चालवायची आहेत. लोकशाही मार्गानेच हा हक्क मिळवायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण २० सप्टेंबरला गणेश विसर्जन असताना, त्याआधीच हा महामोर्चा मुंबईत धडकल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळायचा, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे मुंबईत धडकणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय, आंदोलनाला रोखण्यास स्पष्ट नकार
- पुणे दारुबंदी प्रकरण: १२ दिवसांच्या सरसकट बंदीवरून हायकोर्टाचा संताप, प्रशासनाला विचारला जाब
- मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार: ‘कशाला काड्या लावतोस?’, जिल्हाधिकारी वादावरही दिला सडेतोड खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











