नागपूर: मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, आज मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असतानाच विदर्भ भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे आज नागपूरमधील (Nagpur) रस्त्यांवर पाणी साचले होते. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्यासोबतच वादळ, विजांचा कडकडाट आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशाराही दिला आहे.
उद्या, २९ जुलैसाठी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर तसेच ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
विदर्भासाठी इशारा
हवामान विभागाने ३० जुलैसाठी नागपूरकरिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून प्रशासनाने गावपातळीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत विदर्भात सर्वाधिक पाऊस भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे (१३९ मिमी) नोंदवला गेला. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथे १०३.४ मिमी पावसाची नोंद झाली. या दोन्ही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २९ जुलैसाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’; चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; तर यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांतील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० जुलैसाठी चंद्रपूर जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे, तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ३१ जुलैसाठी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांसाठी पावसाचा अंदाज
३० आणि ३१ जुलै दरम्यान मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ३० जुलै रोजी रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
नागरिकांसाठी सूचना
विजेच्या कडकडाटाचा धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळी हवामानाच्या वेळी मोकळ्या जागेत न थांबण्याचा किंवा झाडांचा आसरा न घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे; तसेच नद्या, ओढे आणि पूरप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्यासही सांगण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांचा मोठा खुलासा; “राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही”
- जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश; 8 राज्यांना नोटीस
- शरद पवार गट NDAमध्ये जाणार? जयकुमार गोरे म्हणाले, ‘ऍडिशन होईल, डिलिशन नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












