🕒 1 min read
चेन्नई– एका बाजूला राज्याची विस्कळीत झालेली आर्थिक घडी आणि दुसरीकडे थेट ६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय नक्की कोणता राजकीय संदेश देऊ पाहत आहेत? त्यांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने सध्या दाक्षिणात्य राजकारण चांगलं तापलं आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. सहकारी बँकांकडून १ मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेतलेले ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आता पूर्णपणे माफ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तमिळनाडू राज्यातील लाखो बळीराजाला थेट आर्थिक बळ मिळणार आहे.
तमिळनाडू शेतकरी पीक कर्जमाफी योजनेचा १४ लाख कुटुंबांना लाभ
या मोठ्या योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे १४.४३ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या मेगा कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ५,९३२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती आव्हानात्मक असतानाही चेन्नई येथील सचिवालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी (CM Joseph Vijay) या फाईलवर स्वाक्षरी केली.
दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांचे सहकारी बँकेतील पीक कर्ज ७५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही सरकारने अंशतः दिलासा दिलाय. अशा शेतकऱ्यांचे ३५,००० रुपये माफ केले जातील, असे अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांनाही काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
वास्तविक पाहता, तमिळनाडू सरकारने गेल्या महिन्यातच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र, ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली होती. लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्री विजय यांनी जुन्या निर्णयात तात्काळ सुधारणा केली आणि ही मर्यादा थेट ७५,००० रुपयांपर्यंत वाढवली.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सरकारी कर्जमाफीची ही संपूर्ण रक्कम ४५ ते ६० दिवसांच्या आत बँकांमध्ये जमा करणे बंधनकारक असते. तमिळनाडू सरकार या नियमांचे पालन करून अत्यंत वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे समजते. आगामी पेरणीच्या हंगामासाठी नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री कार्यालयाने व्यक्त केला आहे. शेतकरी वर्गातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून प्रशासकीय पातळीवर पुढील हालचाली सुरू झाल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- साताऱ्यातील वादावर पडदा! एकनाथ शिंदेंचा थेट आदेश, शंभूराज देसाई आता ‘तो’ वचपा काढणार का?
- रोहित शर्माची दुखापत अन् यशस्वीची लॉटरी? दुसऱ्या वनडेत टीम इंडियात होणार मोठे बदल
- कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












