🕒 1 min read
मुंबई- Ravindra Chavan : राजकारणात मैत्री आणि दुश्मनी कधी बदलेल सांगता येत नाही, पण सध्या महायुतीत जे सुरू आहे, ते पाहून ‘सगळं काही आलबेल नाही’ हे नक्की! महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सत्तेत एकत्र असूनही भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकमेकांचे कपडे फाडू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील एका ठिणगीने आता राज्यभरात वनवा पेटवला आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी केलेल्या एका विधानामुळे तर राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आलेत आणि त्यांचा थेट सामना भाजपशी होतोय. याच रणांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. बुधवारी बोलताना अजितदादा कडाडले, “भाजपने पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्या, हा भ्रष्टाचारच आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.”
७० हजार कोटींच्या जुन्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. झाला ना? मग ज्यांनी ज्यांनी हे आरोप केले, त्या सगळ्यांच्या सोबत आज मी सरकारमध्ये आहे. आहे ना?
राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा PCMC महापालिकेच्या ठेवी ४८४४ कोटी होत्या. आज २००० कोटींवर आणून महापालिकेला कर्जबाजारी केलंय. “एवढा पैसा खर्च केला, तर तो गेला कुठे? रस्ते तर आहेत तिथेच आहेत! सत्ताधाऱ्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्लेत! भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलीये”, अशा शब्दांत अजितदादांनी संताप व्यक्त केला.
भाजपला ‘लुटारूंची टोळी’ म्हणत झोडपलं, अन् त्याचवेळी शरद पवारांचे कौतुक करत १९९२ च्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार थोडे भावूक झाल्याचे दिसले. “आज हे शहर जे काही उभं आहे, त्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच विकासाला गती दिली,” असं म्हणत अजितदादांनी शरद पवारांच्या कामाचा गौरव केला.
Ravindra Chavan on Ajit Pawar
दादांच्या या आरोपांवर भाजप गप्प बसेल का? अजिबात नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर जी प्रतिक्रिया दिलीये, ती महायुतीचं भविष्य धोक्यात आणणारी आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं, “अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होतो का?”
त्यावर चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता कबुली दिली. ते म्हणाले, “हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात… मी देवेंद्र फडणवीस यांना आधीच म्हटलं होतं, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा.” एका प्रदेशाध्यक्षाने उघडपणे अशी खंत व्यक्त करणं, ही साधी गोष्ट नाही.
रवींद्र चव्हाणांनी ( Ravindra Chavan ) अजितदादांच्या ब्रँडिंगचीही खिल्ली उडवली. नाव न घेता ते म्हणाले, “काही लोक एजन्सी भाड्याने घेतात. कोणता शर्ट घालायचा, हे एजन्सी ठरवते. स्क्रिप्ट लिहून मिळते. पैसा बक्कळ आहे म्हणून हे चाललंय.” एकीकडे सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुसरीकडे एकमेकांवर असे गंभीर वार करायचे, यामुळे महायुतीत नक्की चाललंय तरी काय? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीनगरात भाजपचा ‘गेम’ होणार? गुप्त बैठकीत मराठा समाजाचा एल्गार; जरांगे पाटलांचा थेट इशारा!
- शाहरुख ‘देशद्रोही’ तर बांगलादेशच्या शेख हसीना यांना आश्रय देणारे मोदी कोण? संजय सिंहांचा भाजपला सणसणीत सवाल!
- पूजा मोरे प्रकरण पेटलं; हाकेंचा बड्या नेत्यांना ‘ओपन चॅलेंज’, तर जरांगेंचा ट्रोलर्सना दम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












