🕒 1 min read
मुंबई : टी20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाने नुकताच इतिहास रचला आणि ट्रॉफीवर नाव कोरले! मात्र, हा गोड आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण विश्वचषकानंतर भारतीय संघात मोठे आणि अत्यंत धक्कादायक फेरबदल पाहायला मिळाले आहेत. ज्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला, त्यालाच संघातून थेट डच्चू देण्यात आला. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरची संघात एन्ट्री झाली असून त्याच्याकडे थेट कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या बदलावांशिवाय संघात एका नव्या आणि तरुण चेहऱ्याची एन्ट्री झाली, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). वैभवला बॅकअप सलामीवीर (ओपनर) म्हणून संघात स्थान मिळाले. परंतु, खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup)’प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनला अवघ्या 3 सामन्यांनंतर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. संजूला डच्चू देऊन भावनेच्या भरात वैभव सूर्यवंशीला संधी दिली खरी, पण हा पत्ता पूर्णपणे फेल ठरला. वैभव पदार्पणाच्या तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला असून, यामुळे टीम इंडियालाही लागोपाठ पराभवाचे धक्के सहन करावे लागत आहेत. या संपूर्ण वादावर आता भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी ‘जिओस्टार’च्या एका शोमध्ये सडेतोड मत मांडले आहे.
नेहमी संजू सॅमसनचाच बळी का?
संजू सॅमसनला बाहेर ठेवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर पार्थिव पटेलने कडाडून टीका केली आहे. पार्थिव म्हणाला, “नेहमी संजू सॅमसनलाच का टार्गेट केले जाते? गेल्या 11-12 वर्षांतील संजूच्या कारकिर्दीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर ‘कन्सिस्टन्सी’ (सात्यत्य) हा एकच प्रश्न नेहमी त्याच्या मागे लागला आहे. 12 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त एकच हंगाम असा गेला आहे, ज्यात त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची तीच कथा आहे; तो एकतर खूप अप्रतिम खेळतो किंवा पार फ्लॉप होतो. जेव्हा अंतिम निवडीची वेळ येते, तेव्हा हाच मुद्दा त्याच्या आडवा येतो.”
पार्थिवने संघ निवडीवर उडवला धुरळा
पार्थिवने संघ निवडण्याच्या पद्धतीवरच थेट बोट ठेवले आहे. त्याच्या मते, तुम्ही भावना आणि लॉजिक (तर्क) या दोन्ही गोष्टींची खिचडी करून निर्णय घेऊ शकत नाही. पार्थिवने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भावनेच्या भरात तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देणे एकवेळ योग्य वाटू शकते. पण जर लॉजिकने विचार केला, तर संजू सॅमसनला बाहेर बसवण्याचे कारण काय? त्यामुळे संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय निव्वळ भावनेच्या भरात घेतलेला दिसतोय आणि तो चुकला आहे.”
“वैभवकडे गमावण्यासारखं काहीच नाही”
तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी लागोपाठ फेल होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना अभिषेक नायरने मात्र एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला. नायरच्या मते, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर खेळताना वैभवसारख्या नवख्या खेळाडूवर कोणताही दबाव नसतो.
अभिषेक नायर म्हणाला, “समोर जसप्रीत बुमराह किंवा जोफ्रा आर्चरसारखे दिग्गज गोलंदाज असले, तरी खरा दबाव हा त्या गोलंदाजांवरच असतो, नवख्या खेळाडूवर नाही. कारण वैभवसारख्या युवा खेळाडूकडे गमावण्यासारखे काहीच नसते. जर वैभव बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर कोणीही त्याला दोष देणार नाही. पण बुमराहसारख्या गोलंदाजाला नक्कीच भीती असते, कारण समोर असा पोरगा आहे जो पहिल्याच चेंडूवर षटकार मारताना मागेपुढे पाहत नाही.”
मोठ्या नावांना असते प्रतिष्ठेची भीती!
नायरने पुढे स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या गोलंदाजांना आपल्या इभ्रतीची आणि प्रतिष्ठेची जास्त काळजी असते. जर एखादा नवखा मुलगा बुमराहला षटकार मारतो, तर त्या मुलाचा भाव वधारतो आणि गोलंदाजाची पत घसरते. उलट जर गोलंदाजाने त्याला बाद केले, तर लोक म्हणतात की ‘तो तर अजून लहान मुलगा आहे, त्यात काय मोठं!’
त्यामुळेच सुरुवातीला एक तरुण खेळाडू पूर्ण बिनधास्तपणे आणि मोकळेपणाने खेळतो. पण तो जितका जास्त खेळत जाईल आणि नाव कमवेल, तितक्या लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. आणि एकदा अपेक्षांचे ओझे डोक्यावर आले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर तोच परफॉर्मन्स टिकवून ठेवणे भल्याभल्यांना कठीण जाते, असे नायरने स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
- भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
- Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर; महायुती सरकारने सांगितले मोठे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












