🕒 1 min read
बिडकीन (छत्रपती संभाजीनगर) – रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईचे आदेश दिले, पण तळागाळातले पोलीस मात्र टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात भलतेच उद्योग करत असतील तर तुम्ही काय म्हणाल? कारवाईच्या नावाखाली पोलीसच थेट वरिष्ठांचे कडक आदेश धाब्यावर बसवून खासगी मोबाईलवरून मनमानी चलन फाडत असतील तर? बिडकीनमध्ये असाच एक संतापजनक आणि नियमबाह्य प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ८ जूनला मोठी कारवाई झाली. मात्र, बिडकीनमध्ये एका नागरिकाची गाडी चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात उभी असताना, त्याच वेळी ‘चित्तेगाव’ लोकेशन दाखवून वाहतुकीला अडथळा करत असल्याचे ई-चलन त्यांच्या मोबाईलवर धडकले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांनीच पुराव्यासाठी जो फोटो दिलाय, त्यात गाडीच्या शेजारून एक मोठा ट्रक अगदी आरामात जाताना दिसत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मुद्दाच इथे पूर्णपणे फोल ठरत आहे.
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ८ जूनला एकाच दिवसात तब्बल ११४९ वाहनचालकांवर कारवाई करत सुमारे १३ लाख ८४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पण या मोहिमेला गालबोट लावणारी घटना बिडकीनमध्ये घडली आहे.
Traffic Police Action : अधीक्षकांचा आदेश, पण कारवाईत पोलिसांची मनमानी?
या प्रकरणात बिडकीनचे सहायक पोलीस निरीक्षक (API) निलेश शेळके यांच्याकडे विचारणा केली असता, गाडी रस्त्यावर असल्याने मोबाईलवरून फोटो काढून कारवाई केल्याची कबुली त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) कारवाईसाठी केवळ शासनाने दिलेल्या अधिकृत ‘ई-चलन डिव्हाईस’चा (e-challan machine) वापर करणे सक्तीचे केले आहे.
वरिष्ठांच्या या अत्यंत कडक आदेशानुसार, जर कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी स्वतःच्या खासगी मोबाईलवर फोटो काढून नंतर ई-चलन जनरेट करत असेल, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई आणि प्रसंगी थेट निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. तरीही बिडकीनमध्ये हा नियम उघडपणे पायदळी तुडवला गेल्याने आता पोलीस कर्मचाऱ्यांवर यांच्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासगी मोबाईलवरून फोटो काढून अशाप्रकारे दंडात्मक कारवाई करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अशा चुकीच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागृती निर्माण होण्याऐवजी केवळ भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यात मागील दीड वर्षांत तब्बल ५०१ निष्पाप दुचाकीस्वारांचा अपघातात बळी गेला आहे. त्यामुळेच हेल्मेट आणि वेगमर्यादेचे पालन व्हावे यासाठी पोलिसांनी एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. हा उद्देश जरी चांगला असला तरी, टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात खासगी मोबाईलवरून चुकीचे लोकेशन टाकून अशा मनमानी कारवाया होत असतील, तर नागरिकांमध्ये कायद्याचा आदर निर्माण होण्याऐवजी केवळ संताप वाढेल अशीच चर्चा सध्या सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
- लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
- छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












