Sanjay Raut | बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सतत मागणी होत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असं अजित पवार यांच म्हणणं असल्याचं बोललं जातंय. याच मुद्यावरून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अजित पवारांना टोला लगावत तपासाबाबत आरोपही केले आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास ही धूळफेक असल्याचं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले आहेत. “संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स चालला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं पोलीस खातं बरखास्त करा आणि संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेर चालवा. एसआयटीमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो आरोपीशी संबंधित आहे की नाही?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ चालला आहे. त्यांच्या सरकारने आम्हा सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरूंगात डांबलं होते. त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत. भाजप (BJP) ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल,” असा दावाही यावेळी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.
“अजित पवार हे हतबल ॲक्सिडेंटल नेते आहेत. स्वत:च्या कर्तृत्वावर नाही तर भाजपच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना निवडणुकीतमध्ये जागा मिळाल्या आहेत. ते जर महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणातील त्या मंत्र्याला आपल्या मंत्रीमंडळातून वगळलं असते,” असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :