Share

राज्यसभेत मोठा राडा! खर्गेंनी केली अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यसभेतील शिक्षणावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी मनुस्मृती संदर्भातील उल्लेखांवर टीका करत अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

Published On: 

Mallikarjun Kharge

दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत (Rajysabha) विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. तसेच, ‘मनुस्मृती’च्या उल्लेखावरूनही सभागृहात खळबळ उडाली.

खर्गे काय म्हणाले?

राज्यसभेत शिक्षण व्यवस्थेवर चर्चा सुरू असताना, काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर कडक टीका केली. खर्गे म्हणाले की, शिक्षण ही केवळ काही मोजक्या लोकांची मक्तेदारी असू नये, शिक्षण क्षेत्रात प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी. देशातील अनेक शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचा प्रभाव वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, काही ग्रंथांमध्ये असे उल्लेख आढळतात की, जर एखाद्या ‘शूद्रा’ने वेदांचे पठण ऐकले तर त्याच्या कानात वितळलेले शिसं (लेड) आणि जस्त ओतले जावे, आणि जर त्याने वैदिक मंत्रांचा उच्चार केला तर त्याची जीभ कापली जावी. असा मजकूर अभ्यासक्रमातून त्वरित काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, “शिक्षणाचे वाढते खाजगीकरण दलित, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे, ज्यामुळे शिक्षण पुन्हा एकदा काही विशेषाधिकारप्राप्त लोकांची मक्तेदारी बनत आहे. त्यांनी असेही नमूद केले की, सरकारच्या धोरणांमधून अनेकदा ‘मनुस्मृती’वर आधारित ‘मनुवादी’ विचारसरणीचे दर्शन घडते. खर्गे ही विधाने करत असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला.

सत्ताधारी पक्षाचा गदारोळ

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी “गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही” अशा घोषणा दिल्या आणि खर्गे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेत्यांनी केलेले विधान वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. त्यांनी ‘मनुस्मृती’चा मूळ आणि अधिकृत मजकूर सादर करावा.

मनुस्मृतीबाबतचे विधान कामकाजातून वगळले

त्यानंतर, भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विल्यम जोन्स आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा तसेच इतर विविध ग्रंथांचा संदर्भ देत, मूळ मनुस्मृती ग्रंथाच्या सत्यतेची पडताळणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या संपूर्ण वादंगानंतर, सभापतींनी जाहीर केले की मल्लिकार्जुन खर्गे यांनी मनुस्मृतीबाबत केलेले विधान संसदीय कामकाजाच्या नोंदीतून वगळले जाईल.

अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढे बोलताना, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ओबीसी, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या घटकांबाबत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. सरकार आवश्यक भरती प्रक्रिया राबवण्यात अपयशी ठरत असून, त्यामुळे या समाजांतील तरुणांची प्रगती खुंटत असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खर्गे यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही