मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) विस्तार करण्यासाठी मोठ्या बदलांची गरज असल्याचे संकेत रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी दिले आहेत. हे बदल प्रदेशाध्यक्षपदापासून सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केल्याचे समजते. प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, पक्षात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombare-Patil) यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या विरोधात तक्रार केली असून, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रूपाली ठोंबरे-पाटील यांनी काल फेसबुकवर एक पोस्ट केली. अजित दादांच्या कार्यकाळात पक्षात काही निर्णय घेण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी प्रलंबित होती. अचानक अजित दादांबाबत ती दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर जबाबदारी आली. प्रदेशाध्यक्ष बदलल्याशिवाय काम करणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी काल स्पष्ट केले.
NCP discussing state president change & party restructuring
रणनीतीकाराची निवड करणे हा पक्षाचा अधिकार असला, तरी प्रदेशाध्यक्ष बदलणे गरजेचे आहे. अजित दादांचीही तशीच इच्छा होती, प्रदेशाध्यक्ष बदलले जातील, असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. कदाचित माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या मंत्र्यांना याची कल्पना असेल, पण ते त्याबद्दल बोलणे टाळत असावेत. पण का बोलू नये? जर पक्ष संघटना मजबूत करायची असेल, तर बदल होणे आवश्यक आहे, असे रूपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या.
पक्ष संघटनेचा फायदा व्हावा, पक्ष मजबूत व्हावा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी दादांची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची इच्छा होती. १५ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी जेव्हा आम्ही अजित दादांना भेटलो, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते आणि मी जगदंबा देवीची शपथ घेऊन हे सांगत आहे की, त्यांना प्रदेशाध्यक्ष बदलायचे होते.
दादांनी आम्हाला सांगितले तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा जोमाने लढायची आणि जिंकायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत बोलताना दादांनी ही गोष्ट सांगितली. तशाच प्रकारे तटकरे यांनीही पक्ष मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असेही ठोंबरे यांनी नमूद केले.
आमचा कोणताही वैयक्तिक वाद नाही
ठोंबरे यांनी आरोप केला की, तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नियुक्तीपत्रे देण्यातही विलंब होऊ लागला. अजित दादांच्या सूचना असूनही पक्ष कार्यकर्त्यांना डावलले गेले, हे मी स्वतः पाहिले आहे. तटकरे यांच्याशी आमचा कोणताही वैयक्तिक वाद नाही. तरीही, पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे.
उमेश पाटील यांनी केलेली फेसबुक पोस्ट परिस्थितीचे वास्तव दर्शवते. या जुन्या सहकाऱ्यांनी दादांच्या पाठीशी निष्ठापूर्वक उभे राहायला हवे होते, परंतु त्यावेळी ते उभे राहिले नाही. दादांच्या जाण्यानंतरही ही मंडळी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली नाही. दादा गेल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांनी पवार कुटुंबाची खंबीरपणे साथ द्यायला हवी होती, त्यांनी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे होते.
मी काही आरोप करत नाहीये. मी परिस्थितीजन्य साक्षीदार आहे. सर्वांनीच सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे, पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी त्यांनी पवार कुटुंबाची साथ दिली पाहिजे. ते पवार कुटुंबासाठी अडचणी का निर्माण करत आहेत, असा सवाल ठोमरे यांनी उपस्थित केला आणि तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे, अशी मागणी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- FCRA विधेयकावरून संसदेत मोठा संघर्ष; काँग्रेसचा तीन ओळींचा व्हिप, अमित शाह सभागृहात येणार?
- बाप्पाच्या आगमनासाठी एसटीची विशेष तयारी! १० ऑगस्टपासून गट आरक्षण, ७ सप्टेंबरपासून जादा बसेस
- ‘मी तुमच्या पाठीशी आहे’; NDA खासदारांना मोदींचा विकासमंत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












